Friday, November 3, 2017

आरुषी

26 नोव्हेंबर 2013. तलवार कुटुंबियांना जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर त्यांनी केलेल्या कृत्याची india today मध्ये चित्रासहित पान भर आलेली, वाचलेली बातमी मला आठवते आहे...  समाज कुठे चालला आहे? आई बाबाच आपल्या मुलीला मारू शकतात? घोर कलयुग आलाय... असा विचार डोक्यात आला... त्यानंतर अनेक दिवस वाहिन्यांची ही कव्हर स्टोरी होती आणि प्रत्येकाने आपला टीआरपी वाढवला... हे हत्याकांड, ही घटना 16 मे 2008 रोजी घडली आहे हे मला आता कळलंय... काही काळाने मी सुद्धा ही घटना सामान्य माणसासारखा विसरून गेलो...

त्यानंतर 2015 ला आलेला "तलवार" हा चित्रपट मी पाहिला... आतापर्यंत मी इतके चित्रपट पाहिले असतील पण हा पहिला असा चित्रपट होता जो पाहून मी खूप अस्वस्थ झालो हे असे चित्रपट काढुच नये असं मनात आलं... पण त्यावेळी एक गोष्ट कुठेतरी मनात कोरली गेली की तलवार कुटुंब निर्दोष होतं... तो चित्रपट पाहिल्यानंतर मी गुगल ला जाऊन बरेच मुद्दे वाचले त्यात मीडिया ने या केस मध्ये किती इंटरेस्ट घेतला होता हे लगेचच लक्षात येईल. Ipl ला जितका टीआरपी नव्हता तितका तलवार यांच्या केस मुळे न्यूज चॅनेलस ला होता हे "आरुषी" पुस्तकात मांडलंय. कधीकधी  मीडिया सीबीआय च्या पुढे जाऊन आपलं शातीर डोकं लावून आपली मतं स्वतःच तयार करत होती हे मला बऱ्याचवेळा ब्रेकिंग न्यूज मध्ये जाणवत होते. 2015 वेळीच अजून एक चित्रपट आला "रहस्य" नावाचा तो सुद्धा मी पाहिला.. तलवार कुटुंबाने तो रिलीज करू नये असे वाचनात आले होते त्या चित्रपटात आईनेच मुलीची हत्या केली हे दाखवण्यात आले होते... पण रहस्य चित्रपट मला उथळ वाटला, खोटा वाटला जसं मी "आरुषी" पुस्तकात डॉ दहिया आणि सीबीआय च्या काही अधिकाऱ्यांनी (ए. जी. एल. कौल) यांनी मनाला सुचलेली, एखादी रचलेली कथा तयार केली होती अगदी तसाच...

मला आठवतंय 2015 च्या दरम्यान मी एक मित्राशी या विषयावर बोललो होतो त्यावर तो एकदम ठामपणे बोलून गेला अरे तुला माहीत आहे का त्या तलवार कुटुंबानेच हे मर्डर केले आहेत... तो इतका कॉन्फिडन्स ने बोलत होता जणू तो प्रत्यक्षदर्शी होता. मला आश्चर्यच वाटलं आणि काही क्षणासठी असेल सुद्धा असं देखील वाटलं... आपल्याला एखादी घटना 10 ठिकाणी त्याच पद्धतीने दाखवली गेली, सांगितली गेली आणि कानावर पडत राहिली तर आपण सुद्धा जास्त विचार न करता, अभ्यास न करता ती घटना अशीच असेल असा समज करून घेतो. उदाहरण द्यायचे झालं तर विद्यार्थ्याला शाळेत जे शिक्षक शिकवतात ते योग्यच असते असा प्रत्येक विद्यार्थांचा समज असतो त्यात काही चुकतं असेल तरी त्यांना उलटून प्रश्न विचारणारे विद्यार्थी बोटावर मोजता येण्यासारखेच... आणि जरी विचारलाच तर तू शिक्षक आहेस की मी? तुला जास्त कळतं का? असे सवाल येण्याची आणि मार मिळण्याची भीती वेगळीच... आपल्यापेक्षा अनुभवाने आणि वयाने जास्त असलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे हा पर्याय अगदी सहजतेने आपण अंगीकारला आहे...

फिझा झा या आरुषीच्या मैत्रीनीने 12 ऑक्टोबर 2017 रोजी लिहिलेला लेख मी वाचला आता ती 21 वर्षाची झाली आहे. आरुषी खून होण्याच्या आदल्या दिवशी तिच्याकडे गेली होती. हा लेख वाचल्यावर मनात एकदम पक्क झालं की तलवार कुटुंब निर्दोष आहे तरीही फिझा ने शेवटच्या काही ओळींमध्ये लिहिलं होतं की अविरुक सेन यांचे "आरुषी" हे पुस्तक खूप महत्वाचे आहे... त्यानंतर लगेचच मी हे पुस्तक वाचायला घेतलं.. तिने लिहिलेल्या लेखाची लिंक इथे देतोय https://www.thequint.com/news/india/aarushi-was-bubbly-jumping-at-my-house-a-day-before-her-death

आज "आरुषी" हे पुस्तक वाचून झालं... हे पुस्तक वाचल्यावर आपली न्यायव्यवस्था किती कमकुवत आहे असे म्हणण्यापेक्षा ही केस ज्या प्रकारे हाताळली गेली त्या बद्दल कीव येतेय... राग येतोय... पूर्ण पुस्तक जरी कोणी वाचलं नाही आणि शेवटी ज्या न्यायाधीशांनी तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावताना दिलेल्या 26 गोष्टीची यादी जरी वाचली तरी ती कोणत्याही सामान्य माणसाला न पटणारी अशीच आहे...

अविरुक सेन यांनी कोणाचेही नावं न बदलता हे पुस्तक जे सत्य समोर दिसतंय त्याप्रमाणेच लिहिलं आहे आणि म्हणूनच पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे ते एकदम खरे वाटतं... या खटल्यावेळी अविरुक सेन प्रत्यक्षरीत्या तेथे हजार होते त्यामुळे हरेक गोष्टीचा बारकाव्याने अभ्यास करून त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे हे वाचताना क्षणोक्षणी जाणवत.

राजेश तलवार यांनी पुस्तकाच्या तिसऱ्या भागात कारागृहात लिहिलेली डायरी ते निर्दोष असल्याची खात्री देते आणि त्यांना किती भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागले हे आपल्याला कळते...  ज्यांना वाटतं की तलवार कुटुंब निर्दोष होतं आणि ज्यांना वाटत दोषी होतं त्या सर्वानीच हे पुस्तक न विसरता वाचा... कारण हे वाचल्यानंतर आजूबाजूला घडणारी घटना जशी दिसते जशी दाखवली जाते तशी असेलच असे नाही असे आपल्याला कळू लागते आणि त्यावर आपलं मत आपण सहजासहजी कोणासमोर पण व्यक्त करताना, एखादे भाष्य करताना 10 वेळा तरी विचार करू इतकं नक्की...

मी हे पुस्तक वाचायला घेतल्यानंतर काही दिवसातच तलवार कुटुंबाविरुद्ध आवश्यक असे पुरावे नसल्याने त्यांची सुटका करण्यात आली हे वाचनात आले. मनाला खरंच खूप समाधान वाटले... पण याचबरोबर मनात विचार आला त्यांची गेलेली 9 वर्ष त्यांना परत मिळू शकतात का? खरे गुन्हेगार कधी सापडतील का? समाजात तलवार कुटुंबाला आधीचे स्थान आणि मान पुन्हा मिळेल? आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांची लाडकी, त्यांना जिवाहून प्रिय असलेली त्यांची आरुषी त्यांना परत मिळू शकते का? या केस मध्ये अनैतिक संबंध, बलात्कार असे बरेच आरोप प्रत्यारोप आलेत... पण तलवार परिवारावर न कळत सर्वांनीच मग ती सीबीआय असो, मीडिया असो किंवा सामान्य जनता असो लाखो वेळा तो केलाय.

ज्याला कोणाला सत्य जाणून घ्यायचे असेल त्यांनी नक्की " आरुषी" हे पुस्तक वाचा...

Thursday, November 2, 2017

तो आणि ती

तो घरात एकटा बसला होता
ती आज लवकर येणार या आनंदानं त्याच्या चेहेऱ्यावर नकळत स्माईल येत होतं...
तसं तो तिला रोजच भेटतो...
ती रोज ऑफिस वरून आल्यावर दोघे एकत्र वेळ घालवतात...
खरतर रोजरोजच्या त्याच त्याच जगण्याचा भेटण्याचा आजकाल कंटाळा येऊ शकतो...
कधी कधी या दोघांनाही येतोच म्हणा..
तरी तिचं फक्त सोबत असणं त्याला सुखावत त्याला हवंहवंसं वाटत
म्हणूनच की काय लग्नाला इतकी वर्ष उलटल्यानंतर सुद्धा त्यांचं प्रेम कमी झालं नाहीये...

आता काही वेळापूर्वीच तिचा मॅसेज आला की ती उशीरा येणार आहे तिचा कोणीतरी मित्र तिला भेटणार आहे...
थोडं उदास वाटण्यासारखं असंच काहीसं आहे म्हणा पण तरीही मगाशी म्हंटल्याप्रमाण कधी न कधी एकमेकांचा कंटाळा येऊ शकतो ना? असं यानं आज मनाला समजावलं आणि तिला जाण्याची संमती दिली... सहजसहजी नाही हा त्याला हे आवडलं नाही हे त्याने तिला सांगितलंच पण त्यातही त्याला तिची किती ओढ आहे हे कळावं म्हणून फक्त...
तिला सुद्धा असेलच की त्याची ओढ ? फक्त तिने ते व्यक्त केलं नाही इतकंच...

बाकी दोघांचं प्रेम मात्र तसंच चिरतरुण... पहिल्या भेटीसारखं नसेल कदाचित पण मुरलेल्या गोड लोणच्यासारखं... 😄😄😄

शरीरसुख

तिने विचारलं आपल्यात सेक्स करून किती दिवस झाले अशा वेळी पटकन काय बोलायचं हे सुचायला हवं ना बर सेक्स किती वेळा होतो त्यापेक्षा कसा होतो ते महत्त्वाचं... भले तो काही दिवसांनी महिन्यांनी किंवा वर्षाने होउदे पण त्यातलं नावीन्य टिकलं तर गंमत... शेवटी शरीरसुख म्हणजे शरीराचे चोचले पुरवणचं नाही का?? भले भले यात अडकून पडले आहेत ... आयुष्याची घडी बसलेले, विस्कटलेले, त्याच्या मोहापायी वाया गेलेले... शरीरसुख मिळत असेल, समोर आ वासून असेल तर कोणता पुरुष नको बोलेल?...

माझ्या ओळखीतल्या एक लग्न झालेल्या मित्राने कॉलर टाईट करून सांगितलेला किस्सा मला नेहेमी आठवतो आठवतो म्हणण्यापेक्षा त्रास देतो
मला तो सांगत होता, अरे मेरी लाईफ आणि मेरी वाईफ फुल धमाल आहे।।। ऑफिस वरून घरी आल्यावर मी फ्रेश होतो मस्त बायकोने जेवण केलेलं जेवतो ती सर्व घर आवरते भांडी घासून रात्री झोपायला येते तिला झोप आली असेल नसेल मला मात्र रोज सेक्स करायचा असतो 2 ते 3 वेळा तरी खाली झालो पाहिजे तर मजा... मी विचारलं अरे पण तिची इच्छा नसेल तरीही? तो निर्लज्जा सारखं बोलला भाई हक्काची बायको आहे हवंय म्हणजे हवंय द्यावं लागणार तिला... हा तिच्यावर केलेला बलात्काराचा प्रकार माझा मित्र मला छाती फुगवून सांगत होता आणि मी फक्त नंदी बैलासारखा मान डोलवत होतो...

जगातल्या सुंदर दिसणाऱ्या हॉट दिसणाऱ्या सेक्सी फिगर पासून वाईल्ड सेक्स ची आवड असणाऱ्या स्त्री सोबत आपण सेक्स करावा हा किमान 10 पैकी 9 पुरुषांचा विचार किंवा विकार असेल. याविरुद्ध स्त्रियांचं प्रमाण 50-50 असू शकतं आणि त्यातही त्या व्यवस्थित विचार करून खरंच समोरच्याशी तितकं attraction असेल आणि जर खरंच सार काही जुळून आलं तर ते साध्य...मात्र पुरुषांचं घोड ताशी 100 च्या स्पीड ने धावणार...

तरीही कुठे ना कुठे आपण आपल्या माणसाशी जोडलो गेलेलो असतो.. आपल्याला हवी असणारी गोष्ट जो पर्यंत मिळतं नाही तोपर्यंत तिचं नावीन्य ती मिळाल्यावर तीचं महत्त्व सर्वसाधारणच... एकापेक्षा जास्त ठिकाणी शरीरसुख उपभोगण चुकीचं नसेल कदाचित पण तरीही आपल्या व्यक्तीसोबतचा सहवास, त्याच्याशी असलेलं बॉंडिंग, त्याच्या सुगंध, त्याचा सहवास आणि शरीरसुख अनुभवल्या नंतर त्याचं घट्ट मिठीत असणं काही औरच...

Thursday, September 21, 2017

विकृती

लाखो लोक आणि त्यांच्या डोक्यात असलेले करोडो विचार.. अस्वस्थ करणारे, विचार करायला लावणारे, हसवणारे, स्वतःचच हसू करू घेणारे... चीड आणणारे असे अगणिक...

स्वतःच वेगळेपण टिकवून ठेवणाऱ्यांपासून ते आपला टिकाव टिकून राहावा म्हणून धडपडणारे... सोशल मीडिया वर प्रसिद्धी मिळत रहावी जास्तीत जास्त लाईक आणि कॉमेंट्स मिळाव्या म्हणून किमान 12 ते कमाल 20 तास ऑनलाईन असणारे...

नक्की काय हवंय आपल्याला? काय शोधतोय आपण? कुठे जायचे आहे आपल्याला? काय कमवायचे आहे?

आज परेल येथे जी दुर्घटना घडली त्याचा विडिओ सर्व न्यूज वर दाखवतायत त्यात अनेक लोक आपल्या मोबाईल वर व्हिडीओ करताना दिसतायत...

कोणीतरी दुःखात आहे, कोणीतरी मरतोय, कोणावर तरी अतिप्रसंग ओढवतोय आणि त्यावेळी व्हिडीओ करणारे असे सामान्य आहेत का? नक्की सामान्य म्हणायचं का त्यांना? तुमच्या समोर एखादी दुर्घटना घडत असताना तुम्ही इतकं नॉर्मल राहू शकता? मन अस्वस्थ होतं असं काही दिसलं की पाहिलं की माणूस माणुसकी विसरतोय की घाबरतोय मदतीचा हात द्यायला काहीच कळत नाहीये...

एखाद्या घटना स्थळी मोबाईल वर विडिओ करत बसणं ही खरंच एक विकृती आहे यावर वेळीच आवर घालता आला पाहिजे... आपण नकळत या गोष्टींचं व्यसन लावून घेतलं आहे समाजासाठी आपण जरी काही करू शकलो नाही तर निदान समाजाला घातक ठरेल अश्या गोष्टी तरी टाळा...