Tuesday, June 26, 2012

स्वप्नांची घरटी

"सर्वात जवळची माणसंच जास्त तर्हेवाईकपणाने वागतात, त्यांचं आपण मुळीच मनाला लाऊन घेऊ नये. परक्या माणसाकडून कशाचीही अपेक्षा करू नये ह्याचा धडा आपल्याला घरबसल्या मिळावा हा त्याचं सद्हेतू असतो. एकदा हा धडा गिरवला म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख निर्माणच होत नाही." - व. पु. काळे

वाह!... फक्त ३ ओळी... पण खरचं या ३ ओळी जर खऱ्या आयुष्यात आत्मसात केल्या ना तर आपल्या रोजच्या जगण्यातल जवळजवळ ९०% दुखः नाहीसं होईल... बाहेरचे आपल्याबद्दल वाईट बोलतात त्याहीपेक्षा आपल्या घरातले आपल्या बद्दल वाईट बोलले तर त्याचं दुखः जास्त मोठ असतं आणि जर ती गोष्ट आपण मनाला लावून नाही घेतली तर बाहेरचे जग आपल्याला काही बोलो आपल त्याच्याकडे लक्ष जाणार नाही...

प्रत्येकाच्या आयुष्यात ध्येय असतात लाखो स्वप्न असतात ती पूर्ण झाली नाही म्हणून काय कोणी जगण सोडून देत? मनात आलं तरी तस कोणी करू शकणार नाही... कारण स्वप्न पाहण्याचा अधिकार आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही त्यामुळे एक स्वप्न जरी पूर्ण झाले नाही तरी त्या मागोमाग दुसरे स्वप्न साकारण्यासाठी आपण नेहेमी सज्ज असतो... 

स्वप्नांबद्दल मी इकडे मुद्दामच बोललो कारण आपल्या स्वप्नांना बेड्या नसतात ती मुक्त पाखरा सारखी कुठेही विहार करतात... पण अशावेळी त्या स्वप्नांच्या आड न कळत काही अशा व्यक्ती येतात ज्या आपल्या सोबत होतील, आपली साथ देतील असा आपला आंधळा विश्वास असतो... त्यात आपले आईवडील, आपले नातेवाईक आपले मित्र किंवा आपला जीवनसाथी कोणीही असू शकते... आणि जेव्हा त्यांचा विरोध आहे असे दिसून येते तेव्हा आपण हतबल होतो, आपला आत्मविश्वास डळमळतो... अशावेळी काय करायचे कसे वागायचे?... पुढे जायचे की नाही? हरलो तर पडलो तर? या आणि अशा लाखो प्रश्न आपल्याला पडतात... या चक्रव्युहातून जर आपण स्वतःला तारू शकलो तर आपल्याला आपली स्वप्न साकारण्यापासून कोणीच रोखू शकत नाही...

जिद्द आणि चिकाटी अंगी उतरवून ध्येय गाठायचं... आपल्या माणसाचं मनाला मुळीच लागू न घेता त्याचा सकारात्मक विचार करायचा... चांगलं काम करताना खूप अडचणींवर मात करावी लागते खूप कष्ट सोसावे लागतात... दुखांच्या आगीतून स्वतःला तारावे लागते पण त्यानंतर मिळणार समाधान या सर्व गोष्टीवर हलकेच फुंकर घालते... 

आपण जे वाचतो, जे पाहतो, जे ऐकतो... त्याचा नकळत आपल्या मनावर थोडा का होईना परिणाम होतच असतो... म्हणूनच व. पुच्या या ३ ओळी मनाच्या कप्यात कायमस्वरूपी ठेवण्याचा प्रयत्न करुया आणि स्वप्नांची नवनवी घरटी बांधूया...


Monday, June 18, 2012

शोध स्वतःचा...

स्वतःचा शोध घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचं?

विचार करत रहायचं?...
स्वतःला आरशात पहायचं?...
की इतरांसारख मुखवटा लावून गल्लोगल्ली फिरायचं?...

स्वतःचा शोध घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचं?


जीवनाच्या वाटेवर हा प्रश्न आपली पाठ काही सोडत नाही... तो आपल्या सोबत कायम सावलीसारखा असतो...

कधी दुखः डोंगराएवढ असत.. कधी आत्मसन्मान दुखावला जातो... तर कधी आपला वाटणारा माणूसच आपल्या पाठीत नकळत खंजीर खुपसतो... आणि मग आपण कोण आहोत? आपल्या सोबतच अस का घडतं? आपलं काय चुकल... याची बेरीज वजाबाकी आपण करतो... आणि मग स्वतःचा शोध घेण्याचा फसवा प्रयत्न नेहेमी करत राहतो...


अशावेळी नक्की कसं वागायचं?... काय करायचं? हे आपल्याला समजत नाही... आपण त्या द्वेषात नको ते करून बसण्याची शक्यता अधिक दाट असते...
हे कसं टाळता येईल?
स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा शोध कसा घेता येईल?

आपण केलेल्या चुका तर आपल्याला टाळता आल्या नाहीत पण त्या पुन्हा होऊ नयेत यासाठी आपण काय करावं?... याचा विचार नक्कीच आपण करू शकतो...

आणि या सर्वासाठी एक अशी व्यक्ती हवी ज्याला आपण तो सन्मान बहाल करू... त्या व्यक्तीवर विश्वास आणि श्रद्धा ठेवू...मग तो आपला मित्र असेल... आपले आई वडील असतील... शिक्षक किंवा गुरु असतील...

त्यावेळी मात्र त्या व्यक्तीच सार काही ऐकून त्यावर विचारमंथन करण्याची गरज नितांत गरज असते... त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध ही असतील पण त्या आपल्या भल्याच्याच असतील यावर विश्वास हवा... भगवान श्री कृष्णानी सुद्धा जेव्हा अर्जुनाचा रथ कुरुक्षेत्रावर नेला तेव्हा समोर आपले नातेवाईक आपल्या विरुद्ध लढाईला उभे आहेत हे पाहून अर्जुन सुद्धा काही क्षणांसाठी चलबिचल झाला होता आपलेही असे होऊ शकते... पण भगवंतावर असलेल्या भक्ती आणि श्रद्धे कारणच तो भगवतगीते सारखा महान उपदेश ऐकू शकला... आणि त्याला त्याचा मार्ग गवसला...

शरण गेल्याशिवाय जीवन वा मरण उमगणार नाही...

आज जरी पैसा माणसाजवळ असला तरीही आपल्याला आयुष्यात नक्की काय हवं?... कोणत्या गोष्टीची आपल्याला जास्तीत जास्त गरज आहे?... आणि याही पेक्षा महत्वाचे म्हणजे आपल्याला नक्की काय कमवायचंय याचा शोध घ्यायला हवा...

प्रश्नाला उत्तर असत आणि सुरुवातीला शेवट...
आपल्या हातात एकच आहे...
शेवट गोड कसा होईल याचा विचार करून प्रत्येक पाऊल टाकत रहायचं...