Showing posts with label marathi blog. Show all posts
Showing posts with label marathi blog. Show all posts

Wednesday, March 25, 2020

परीक्षित

दादर ट्रेनच्या गर्दीतून धक्काबुक्की करत करत अनिकेत फाइनली सेकण्ड क्लासच्या डब्यात शिरला. ट्रेनच्या दरवाज्यालगत थोडी का होईना हवा लागावी म्हणून तिथे त्याने थोडीशी जागा पटकावली. ट्रेनचा भोंगा जोरात वाजला ट्रेनने दादर स्टेशन सोडले. तितक्यातच घामाच्या धारेत न्हाउन निघालेला एक भैया धावत धावत डब्यात घुसला आणि अनिकेतला खेटून उभा राहिला. आधीच अंगाची लाही लाही होत असताना हा भैया अंगाला चिकटतोच कसा यावरून त्याने भैयावर खेकसायला सुरूवात केली 'अबे साले समझता नाही क्या? फर्स्ट टाईम ट्रेन मे चढा है क्या? तू एक काम कर मेरी गोदी मैं बैठ' भैया सर्व शांतातेने ऐकतोय हे पाहून त्याचा पारा आणखी चढला. शेवटी भैयाला दोन-तीन शिव्या देऊन त्याला हायसे वाटले. बिचारा भैया एक फूट लांब जाऊन उभा राहिला. तरीही अनिकेत तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपूटत होता.

दादर ते अंबरनाथ असा रोजचा प्रवास आणि त्यात अशी चित्रविचित्र माणसे जीणे नकोस वाटत कधी कधी. हे आणि असे अनेक विचार त्याच डोक पोखरत होते. खर सांगायच तर जॉबमध्ये अनिकेतला रस नव्हताच त्याचा कल बिजनेसकडे होता पण इतका पैसा येणार कुठून? आणि कसा?? शेवटी उत्तर न सापडल्याने त्याने जॉब करण्याचा निर्णय मनाच्या विरोधात जाऊन घेतला होता. 

तस पाहायला तर घरात सर्व छान चालू होत. वडील बीएमसी मध्ये, लहान अन मोठा भाऊ दोघे कामावर आणी राहायला अंबरनाथ मध्ये बंगला तरीही मनाच समाधान महत्वाच अस मानणारा अनिकेत.

पाच मिनिटे झाली तरी गाडी जागची हलत नव्हती गर्दीतून आत जावे, असा विचार करून सुद्धा फायदा नव्हता कारण गर्दी इतकी होती की लोक एकमेकांना मिठी मारुन उभे असल्याचा भास होत होता.

ट्रेन सुरू होतच अनिकेतला हायसे वाटले जवळजवळ सहा फूट उंची, मजबूत बांधा, थोडा राग आला तरी लालबुंद होईल असा गोरा वर्ण, अंगावर नेहेमी कडक ईस्त्री असलेले कपडे आणि जेवणाचा डबा मावेल इतक्या आकाराची बॅग, अशा गर्दीत त्याच्या दोन मोठ्या बॅगांची दुर्दशा झाली होती तेव्हापासून त्याने पुन्हा कधी मोठी बॅग घेतलीच नाही; बाकी सर्व सामान तो ऑफीसच्या लॉकर मध्येच ठेवायचा.

ट्रेनचा स्पीड वाढत होता तसतसा दमट वारा अनिकेतला दिलासा देत होता तरीसुद्धा कोणाचा थोडासा धक्का लागणेही त्याला सहन होत नव्हतं.

अनिकेतचा स्वभाव आधी इतका तापट नव्हताच, समोरच्यावर चिडताना तो दहा वेळा विचार करायचा आणि कधी रागच्या भरात कोणालाही काही बोलला तरी त्याला नंतर पश्याताप व्हायचा. माफी मागायला आणि माफ करायला नेहेमी पुढे असायचा. मित्र आणि नाती यापुढे त्याला सर्व फिक वाटायचे. त्याचे बाबा त्याला नेहेमी सांगायचे "अरे असा नको राहूस रे, व्यवहार समजले पाहिजेत आता तू मोठा झाला आहेस", पण अनिकेत! तो मात्र एकदम कूल.

पण काही अनुभव इतके वाईट असतात; की त्यामुळे दुसर्‍याबदद्ल चांगले मनात असतनासुद्धा माणूस तसा वागत नाही. अनिकेतचे नातेवाईक, जे त्याला एकदम जवळचे होते; तेच नकळत त्याच्यापासून दुरवले होते. तो ज्या जवळच्या लोकांवर जीव ओवाळून टाकत होता तीच त्याची जवळची माणसे त्याच्यापासून दूर जायची हा त्याचा नेहेमीचा अनुभव आणि याची सल काही केल्या त्याच्या मनातून जात नव्हती. त्याचे मित्र, त्याचे नातेवाईक एवढेच नाही तर त्याच्या घरातल्यांकडून सुद्धा त्याला हाच अनुभव आला होता.

त्याच्या अशा स्वभावासाठी कारणीभूत असलेली अशीच एक कॉलेज च्या दिवसाची गोष्ट.

११वि साठी अनिकेतचे अड्मिशन रुईया कॉलेज मध्ये झाले. तसे त्याला कॉलेज करायचे नव्हते त्याचा इण्टरेस्ट पेंटिंग मध्ये होता पण जे जे ला जायचे असेल तर १२वी करणे गरजेचे होते. म्हणून त्याने आर्ट साइट घेऊन बारावी करण्याचा विचार केलेला. कधी नाही ते त्याला दहावी ला चांगले टक्के मिळाल्याने त्याचे अड्मिशन पटकन झाले.

कॉलेजचा पहिला दिवस. कॉलेज म्हणजे काय हे टीव्ही आणि फिल्म मध्ये पाहिलेले, त्यामुळे मनामध्ये थोडीशी भीती आणि एक्साईटमेंट. शाळेमध्ये रोजचा यूनिफॉर्म पण आता रोज रंगीबेरंगी कपडे घालता येणार त्यामुळे त्याचा चेहेरा चांगलाच फुलला होता.

वर्गासमोर येताच त्याच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले. इकडे तिकडे न बघता अनिकेत वर्गात शिरला. मुद्दाम काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी त्याने बॅगेतून वही बाहेर काढली आणि हळूच तिरक्या नजरेने इकडे तिकडे पाहु लागला. नवनवीन चेहेरे स्टाइल मारणारी मुले चेहेर्‍याची रंगरंगोटी केलेल्या मुली आणि यांच्यामध्ये अनिकेत सारखी दबकून खाली मान घालून बसलेली काही मुले.

वर्ग जवळजवळ पूर्ण भरला होता. तितक्यात दोन-तीन मुलांनी एकत्र आवाज केला 'वॉव, क्या आयटम है'.' अनिकेत ने त्यांच्याकडे पाहून ते कुठे पाहून बोलत आहेत याचा त्याने अंदाज घेतला आणि त्या दिशेने आपली नजर फिरवली. एक सुंदर मुलगी वर्गात पहिल्या रांगेत येऊन बसली आणि बाजूला तिच्या ओळखीच्या मुलीशी बोलू लागली. गोरा वर्ण, काळेभोर लांब केस, पाणीदार डोळे, गालावर खळी, ओठांना हलकीशी लिपस्टिक, आणि लक्ष वेधून घेईल असा गुलाबी रंगाचा लांब कुर्ता. फिल्म मधली हीरोइन किंवा स्वप्नपरी भासणारी ती मुलगी अनिकेत ला सुद्धा आवडली पण तरी त्याने हि बड्या घरची दिसतेय आपल्याला नाही परवडणार असे मनाला समजावून दुर्लक्ष केले. 

शाळेत असताना असे बरेच वाटायचे कि मुलींशी बोलावे, टिपिकल गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखे हातात हात घालून चालावे पण निळी हाफ चड्डी आणि सफेद शर्ट वर हातात हात घालून फिरणे तर दूरच मुलींशी बोलायला पण लाज वाटायची. त्यातही अनिकेत ला एखादी मुलगी आवडली कि त्या आधीच त्या ऑलरेडी एन्गेज आहे हे त्याला कळायचं. 

क्लासटीचर काही वेळाने वर्गात आले आणि त्यांनी प्रत्येकाची ओळख उभं काहून करून द्यायला सांगितली
ती उभी राहिली आणि अनिकेत च डोळे वटारून कान टवकारून तिच्याकडे पाहू लागला. तिने नाव घेतले
‘अनुपमा राणे’.

वाह! अनिकेत ने मनातच म्हटले. नाव एकदम बरोबरच होते अनुपमा- जिला उपमा देता येत नाही, अद्वितीय अशी.

अनिकेत चा पहिला दिवस थोडा टेन्शन मध्येच गेला कॉलेज हा प्रकार फक्त चित्रपटात पहिला होता जो आता तो समोर अनुभवत होता. त्याच्या बाजूला बसलेल्या दोन टपोरी मुलांशी त्याची ओळख झाली. दिनेश आणि राहुल अशी त्यांची नावे.

दिनेश दिसायला तसा छ्परीच होता. वेणी बांधता येईल इतके लांब केस, कॉलर वर केलेली, रंगीबेरंगी फुलांचा शर्ट, आणि नवी कोरी पण विविध रंगाचे ठिगळं असलेली स्टायलीस्ट जीन्स, दणकट शरीर असलेला दिनेश आठवड्यातले ४ दिवस तरी नक्कीच नॉनव्हेज वर ताव मारत असणार हे त्याला पाहून लगेच जाणवेल.
राहुल मात्र सडपातळ, उंच आणि शांत होता. चेहेर्‍यावरून आणि पेहेरावावरून साधा वाटत असला तरी त्यांच्या प्रत्येक वाक्यात शिवी असायची जर त्याला सांगितले कि ‘ मी शिव्या देणे सोडतो असे वाक्य बोल’ तर त्यातही त्याने २/४ शिव्या नक्कीच दिल्या असत्या. एकंदर स्वभावाने ते त्याला चांगले वाटल्याने त्यांच्याशी मैत्री करणे त्याला वावगे वाटले नाही. पण त्यांच्या अनुपमा बद्दल च्या कॉमेंट्स त्याला अजिबात आवडत नव्हत्या.

कॉलेज सुटल्यानंतर अनिकेत बाहेर आला त्याला अनुपमा दिसली त्याला दिसलं कि कोणीतरी मुलगा तिला घ्यायला आला होता ती मैत्रिणीला बाय बोलून त्याच्या बाईक वर बसली अनिकेतचं पुन्हा एकदा त्याला आवडलेल्या व्यक्तीचा बॉयफ्रेंड असतोच ह्यावर शिक्कामोर्तब झालं. अनिकेत घरी जाण्यासाठी निघाला तितक्यात दिनेश ने त्याला हात खेचून मागे घेतले आणि त्याला बोलला ‘ काय रे कुठे निघालास?... तितक्यात राहुल सुरु झाला ‘ असे कुत्र्याला हड्डी दिसली कि तो जाणारच ना त्यामागे’ अनिकेत त्याच्याकडे रागाने पाहू लागला. दिनेश हसून बोलला 'रागावू नकोस रे चल आमच्याबरोबर फिल्म पाहायला जावू'. माझ्याकडे पैसे नाहीत रे तुम्हीच जा असे बोलून अनिकेत त्यांना टाळू लागला.
‘अरे पैसे खूप आहेत माझ्या बापाकडे. तू काळजी करू नकोस फक्त चल’ दोघे त्याला ओढत घेऊन गेले.

तिघे चित्रपट गृहात शिरले... दो प्यार करने वाले जंगल में खो गये हे जंगल चित्रपटातलं गाणं ऐकताना अनिकेत सुद्धा त्या प्रेमाच्या जंगलात हरवून गेला. पूर्ण चित्रपटात तो स्वतःला समोर पाहत होता...  क्रमश: 

Thursday, March 31, 2011

'प्रेमभंग' - संभाषण

प्रेम हा विषय सर्वांसाठी जवळचा आणि जुना पण त्या पेक्षाही 'प्रेमभंग' हा विषय गहिरा आणि न शोधताही जागोजागी सापडणारा.
अश्याच एक मुलाच्या भावना जपणारा त्याचा मित्र, जो त्याच प्रकरणातुन सुखरूप बाहेर पडला आहे त्या दोघांचे संभाषण कसे असू शकते हे जाणण्याचा हा एक प्रयत्न;

मित्र १ - हेलो कसा आहेस रे?

मित्र २ - मी मस्त. तू कसा आहेस?

मित्र १ - अरे मी पण ठीक आहे. कालच तुझ्या कविता वाचल्या. छान आहेत. कसे जमते हे तुला?

मित्र २ - (हसतो) सुचेल तसे लिहायचे...मग जमते आपोआप.

मित्र १ - मी देखील खुप प्रयत्न केला रे पण नाही जमत तुझ्यासारख लिहायला :( ... खरच रे मस्त लिहितोस...मला एक सांगशील का?

मित्र २ - विचार ना.

मित्र १ - आनंदात रहायला काही कारण लागत का रे मित्रा?

मित्र २ - नाही रे...आनंदात रहाण्यासाठी तसे काहीच कारण लागत नाही.. आणि जरी असले तरी माझ्या दृष्टीने एक गुपित आहे आनंदाचे ते म्हणजे 'समाधान'. आयुष्यात काही मिळो वा न मिळो त्यातून समाधान मिळाले की आनंद आपोआपच गवसेल.

मित्र १ - हो रे तू बोलतोस ते खरे आहे पण... पण कधी कधी एकदम तुटून जातो मी नाही राहता येत आनंदात...

मित्र २ - तेव्हा स्वत:ला कशात तरी गुंतवून घ्यायचे... जे आवडते ते करण्याचा प्रयत्न करायचा

मित्र १ - हो रे मी तेच करतो पण राहून राहून तेच सगळे नको असलेले विचार डोक्यात येतात आणि सगळे एकदम गुंतागुंतीचे होते, मन नाही लागत कुठेही, सुचत नाही काहीही, कोठे आहोत काय करतो काही समजतच नाही.

मित्र २ - हम्म प्रेम? की प्रेम भंग काय आहे?

मित्र १ - तुला कसे कळले ?

मित्र २ - (हसतो) प्रत्येकाची लाइफ सारखीच असते रे थोड्या फार फरकाने...

मित्र १ - सारखे सारखे ते डोक्यात थैमान घालते आहे रे.

मित्र २ - मग डोक्यात आले की ते का येते? आणि ते येऊन माझे आयुष्य चांगले होणार आहे का.. की त्यामुळे मी भरकटत जातोय हा विचार करायचा...

मित्र १ - हो खरय, मी अजुन तरी भरकटलो नाहीये, पण खरच सांगतो आपण ज्याला मनापासून सर्व काही देतो तोच आपला विश्वासघात करतो असे का होते रे?

मित्र २ - असे वाटून नको घेऊस मित्रा...प्रेम हे निस्वार्थी हवे... त्यात समर्पण असावे... समोरची व्यक्ति तुझ्याबरोबर आनंदित नसेल तर असे प्रेम मिळवून तू तरी आनंदी राहशील का? ती व्यक्ती जिकडे खुश आहे तिकडे राहुदे त्या व्यक्तीला... तू फक्त देवाकडे त्याचा आनंद मागत राहा अखंड, कारण तुझे प्रेम खरे आहे तर तू त्या व्यक्तीसाठी फक्त प्रार्थना आणि चांगले तेच मागू शकतोस देवाकडे. त्या व्यक्तीचा आनंद हा तुझा आनंदचा स्त्रोत असेल.

मित्र १ - होय मलाही असेच वाटते... तीलाहि मी हेच संगितल की तुला जे प्रिय आहे तिकडेच तू राहा... पण माझी अशी अवस्था आहे "माणूस धड उडत पण नाही आणि धड पडत पण नाही". मी दिलेल काही मागत नाही आहे किंवा त्याचा मोबदला पण मागत नाही आहे पण खर काय ते सांगून, तीने तू माझ्या आयुष्यातून निघून जा हे सांगितले पाहिजे ना मित्रा? मन शांत ठेवण्यासाठी तर मी देवाचा आधार पण घेतला आहे.

मित्र २ - अरे हे असे काही जीवनात घडले की आपण स्ट्रॉंग होतो... आणि ती आपण आपली कमजोरी न समजता स्ट्रॉंग पॉइण्ट समजायचा... हरण्यात सुद्धा एक वेगळीच मजा आहे ...

मित्र १ - ह...पण रोज आपण विचार करायचा की आता फ़ोन येईल आता ती मला येऊन भेटेल, पण हे काय ही तर दुसऱ्याबरोबर गेली सुद्धा आपण परत हताश होऊन आपल काय चुकल हा विचार करत कुडत बसायच,,,,, आणि संध्याकाळी परत ती फ़ोन करते "कसा आहेस तू ? काय करतोय? जेवलास की नाही...मला आज तुझी खुप आठवण येत होती रे" काय बोलायच ह्याच्या पुढे.

मित्र २ - हे कधी घडले ?

मित्र १ - तुला सर्व सांगतो. गेली ४ वर्ष आम्ही एकत्र आहोत. पण या १४ फेब्रुवारी ला भयानक प्रकर घडला

मित्र २ - काय घडले??

मित्र १ - मला भेटायचे कबूल केले होते तिने पण फ़ोन करून ती बोलली की मी नाही भेटणार. मी विचारल सुद्धा का ते पण बोलली की मी घरी जाते आहे कॉलेज वरून बर नाही वाटत. मी बोललो ठीक आहे काळजी घे. तिला घरी पोहोचायला ३० मिनिटे लागतात पण ५.३० ला निघून ती ९.३० ला घरी गेली

मित्र २ - हे तुला कसे समजले

मित्र १ - माझ नशीब ख़राब. कारण त्याच वेळी मीसुद्धा स्टेशन वरून घरी निघालेलो. अचानक दोघे समोर... विचार कर काय अवस्था झाली असेल माझी? ती खर बोलून गेली असती तर समजुन पण घेतले असते रे पण खोट बोलली याचे खुप वाईट वाटते आहे.

मित्र २ - या जगात जर प्रत्येकाला हवे तसे मिळत गेले तर जगात दुःख राहणारच नाही रे आणि दुःख नसेल तर सुखाचे महत्त्व कसे समजेल?
एक सांगू समोरचा कितीहि वाईट वागू दे आपण चांगलेच वागायचे... समोरच्याला त्याची चुक आपणहून कळते... आणि नाही कळली तरी कोई बात नहीं...कारण आख्ख आयुष्य आहे रे मित्रा...एकच गोष्ट नाही लाइफ मध्ये... मित्रा ठेच लागुन पडलास तर काय चालणे सोडून देणार का ?
तिला असे काही करून दाखव की तिला समजले पाहिजे की तिने काय गमावले आहे...तू गमावले असे चुकुनही समजू नकोस... काय कमावले आणि काय गमावले याहीपेक्षा यातून काय शिकलो ते जाणून घेणे जास्त गरजेचे नाही का?

मित्र १ - खरच एकदम मनातल बोललास, तू पण माझ्यासारखा मनकवडा आहेस का रे? कारण तू बोलतोय ना ते करतोय मी...

मित्र २ - आयुष्य सार काही शिकवत बघ... पाण्यात पडलो की पाय मारायला आपसुकच येते ना? झाले ते विसरून फ़क्त पुढे चालत रहायचे... आता या साऱ्या पसाऱ्यातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न कर...

मित्र १ - नक्की मित्रा मी ह्यातून बाहेर पडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन. आणि नाव कमविन... खुप खुप मोठा होईल... थैंक्स मित्रा आज खुप हलके वाटते आहे

मित्र २ - नक्की होशील मला विश्वास आहे... इतका मोठा हो की प्रत्येकाने तुझ्यावर प्रेम केले पाहिजे तुझा आदर केला पाहिजे... फ़क्त जगण्याचा एक मंत्र लक्षात ठेव... पाय नेहेमी जमिनीवर ठेव तरच दुनिया तुझ्या पायाजवळ असेल... ऑल द बेस्ट फॉर लाइफ... आता ठेवतो फ़ोन काळजी घे बाय

मित्र १ - तू सुद्धा मित्रा बाय

Saturday, March 5, 2011

'तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलंसं गाव'

आज सहज दादर ला स्पेक्ट्रा मध्ये गेलो होतो समोरच एक लक्ष वेधून घेणारे सीडी कव्हर नजरेसमोर आले.

'तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलंसं गाव'
गायक संगीतकार मिलिंद इंगळे आणि कवी ज्ञानेश वाकुडकर यांचा एक आगळवेगळा प्रयोग...

प्रेयसिच सौंदर्य वर्णन करणार २१ अंतर्‍याच एक सलग गाणं
बापरे!!! वाचूनच टेन्शन आले आधीच आजकालची ५ मिनिटांची गाणी सुद्धा नकोशी वाटतात तिकडे ३६ मिनिटाचे सलग गाणे??

पहिले तर मिलिंद इंगळे यांना सलाम केलाच पाहिजे कारण अशी जोखीम उचलनं खरच... हॅंड्ज़ ऑफ टू मिलिंद सर...

सीडी कव्हरच्या आतील मजकूर पण खूप काही सांगून गेला... मिलिंद इंगळे, ज्ञानेश वाकुडकर आणि प्रायोजक सागर शिरोळे याची नेमकी पण सुंदर अशी प्रस्तावना.... आणि १ ते २१ अंतरे अनुक्रमणिके सहित...

या प्रवासात प्रत्येकाने केलेल्या कामाची पावती त्यांच्या फोटोसहित न विसरता दिली गेली आहे हे विशेष... एकूणच सर्व छान जुळून आले आहे हे समजून आले होतेच...

उत्कंठा वाढत चाललेली म्हणून वेळ वाया न घालवता सीडी ऐकण्यासाठी लॅपटॉप चालू केला.

एका प्रेयसिच इतक छान सौंदर्य वर्णन इतक्या सोप्या शब्दात आणि तेही थोडक्यात नव्हे तर शंभर पानात... भन्नाट!

मिलिंद इंगळे यांचा गुंग करणारा आवाज... धुंद करणारे मधुर संगीत त्याहीपेक्षा प्रत्येक प्रियकराला प्रेयसीची आठवन करून देणारे आपलेसे वाटणारे निरागस शब्द...

प्रेयसी आणि प्रियकर यांनी एकदा तरी ऐकावे ऐकण्यापेक्षा रंगून जावे असे मला मनापासून वाटते...
गेली चार वर्ष प्रचंड मेहेनत करून मिलिंद आणि त्याच्या टीम ने उभं केलेल प्रेयसिच गाव केवळ १०० रु मध्ये उपलब्ध आहे... आपल्या प्रीयकरला आणि प्रेयसीला अजून आपलेसे करण्यासाठी याहून वेगळी भेट अजुन काय असु शकते.

सर्व काही छान झाले असले तरी एक गोष्ट मनाला सल लावते की जर असे निराळे काही येत आहे तर ते लोकांपर्यत त्याच ताकदीने का नाही पोहोचत... या गोष्टीमध्ये मराठी माणूस नेहेमीच मागे पडतोय.. मी ऑनलाइन सर्च केल्यानंतर त्याबद्दल काहीच गवसले नाही सध्याच्या धावत्या युगात मुख्यत: ऑनलाइन अश्या वेगळ्या प्रॉजेक्ट्सना पुढे आणण्याची खूप गरज आहे...

चला हे वाचून काही क्रांती घडली तर याहून आनंदाची गोष्ट काय असावी...

Thursday, May 27, 2010

' एक अंत आत '

एक अंत आत ' म्हणजे एकांत.. आयुष्यात काही क्षण इतके हळवे असतात की तेव्हा माणसाला एकांत हवा असतो... बर्‍याचवेळी हा एकांत आपल्या जवळच्या व्यक्तीच्या विचित्र वागण्यानेच हवा असतो हे न पचणारे न पटणारे तथ्य...
एखाद्या व्यक्तीचे विचित्र वागणे, मन दुखावणे, सोडून जाणे या आणि अश्या असंख्य गोष्टी ज्याने मन बेचैन होते आणि मग आपल्याला हवा असतो तो फक्त आणि फक्त एकांत...

एकांत चांगला की वाईट?? यावर प्रत्येकाचे वेगळे वेगळे मत असु शकते... पण तो सर्वांना हवा असतो हेही तितकेच खरे... कधी कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी, त्रास देणारे क्षण विसरण्यासाठी... आयुष्यातली न सुटणारी कोडी सोडवण्यासाठी...तर कधी सार्‍याचाच कंटाळा येऊन फक्त आणि फक्त एकट राहण्यासाठी.. अश्या असंख्य कारणांसाठी प्रत्येकाला एकांत हवा असतो...भारताची लोकसंख्या पाहिली तर अशी किती कारण असतील याचा विचार न केलेलाच बरा नाहीतर त्यासाठी सुद्धा एकांत शोधावा लागेल...

जेव्हा कधी आपल्याला वाटेल की एखादी आपल्या जवळची व्यक्ती दु:खी आहे त्यावेळी तिला एकटे राहू द्या... तो अनुभव त्या व्यक्तीला खूप काही देऊन जातो सांत्वन करण्यापेक्षा त्या व्यक्तीला थोडासा वेळ देणे जास्त योग्य... एकांत आणि एकाकिपणा यात खूप फरक आहे... वपूंच्या भाषेत सांगायचे तर 'एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा, एकांताची माझी व्याख्या फार वेगळी आहे. परिसराचं मौन म्हणजे एकांत. आणि परिवारात असतानाही निराधार वाटणं हे एकाकीपण. जेव्हा कधी दु:ख होईल तेव्हा एकांतात जा, मनसोक्त रड. जमिनीला अश्रू हवे असतात. मातीचं देणं चुकवलं की हलका होशील. वर चढशील, आकाशाजवळ पोहोचशील.असचं कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम, 'तुका आकाशाएवढा' असं लिहून गेला असेल.’

आयुष्य जगताना खूप खाचखळगे होते, असणार आणि कायम राहणार...चालताचालता लागलं तर कोणी चालणे सोडत नाही.... आयुष्यात जवळचे कोणी गेले तर कोणी जगणे सोडत नाही.. तसेच कोणी बरोबर असो वा नसो एकांत हा सुद्धा कोणीच सोडू शकत नाही...

एकदा असच एकट बसून विचार करत होतो ...आपण काय कमावले आणि काय गमावले याचा... मग आठवेल की किती दिवस आपण गाभूळलेल्या चिंचा खाल्या नाहीत.. आकाशात उडणार्‍या पक्षाकडे एकटक पाहिले नाही... जत्रेत मिळणारी शिट्टी वाजवली नाही... रात्री अंगणात झोपून काळ्याकुटट आकाश्यातल्या चांदण्या मोजल्या नाहीत... कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्म आता उरला नाही... ती उडू शकते कारण तिचे पंख तिने कधीच बांधले नाही.. आपण मात्र अजूनही आपले पंख बांधून उडण्याचा प्रयत्न करतोय...मनसोक्त हसण्यासाठी सुद्धा आपल्याला लोक काय बोलतील याचा विचार करतो.. लहानपण देगा देवा हे वाक्य अजूनही हवेहवेसे वाटते ते या कारणांमुळेच...

'एकांत' इतर अनुभवांसारखाच हा सुद्धा एक प्रकृतीचा आणि मनाचा भाग आहे आणि तो फक्त अनुभवायचा कधी दु:खात तर कधी सुखातही...

Tuesday, May 18, 2010

अपेक्षांचे ओझे

"सर्वच क्षेत्रांत स्पर्धा असल्याने मुलांवर ताण येतो. अशा वेळी मुलांशी मैत्री करा; त्यांना समजून घ्या. त्यांच्या अडचणी जाणून घ्या. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणू नका,' अशी कळकळीची विनंती आत्महत्या केलेल्या मुलांच्या पालकांनी समाजाला केली आहे. आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरील उपाय नाही. आत्महत्येचा विचार करण्यापूर्वी आपणही समाजाचे; आई-वडिलांचे काही देणे लागतो, याचे भान ठेवा, असे मनःपूर्वक आवाहन त्यांनी केले आहे -
वृत्तपत्र - ई-सकाळ

पालक आणि मुले यांच्यातली दरी आणखी खोल खोल होत चालली आहे का??.. असा प्रश्न निर्माण करणारा हा लेख....

एखादे अपत्य जन्माला आले की त्याबरोबर अजून एका गोष्टीचा जन्म होतो आणि तो म्हणजे ' अपेक्षा ' या लहान वाटणार्‍या शब्दाचा...
लहान असताना मुलाच्या तोंडी पहिला शब्द असतो तो 'अ'.. पण मुलाने 'अ'पेक्षा जास्त बोलावे साठी प्रयत्न सुरू होतात... मग त्याला काका, मामा, दादा, मावशी असे शब्द बोलायला शिकवले जाते... आणि ते तो बोलू लागला की अजून बरेच शब्द (जे त्याला त्या वयात शक्य होऊ शकत नाही ते सुद्धा) त्याला शिकवण्याचा अट्टहास केला जातो....मूल जसजसे मोठे होत जाते तसेच अपेक्षेचे शेपूट वाढत वाढत जाते...
आपला मुलगा आपल्या शब्दाबाहेर नाही हे दाखवण्यासाठी नकळत आपण त्याच्यावर मोठे ओझे टाकून मोकळे होतो (मी नकळत असे म्हटले आहे) काही मुलांनी जरी हे कर्तव्य म्हणून स्वीकारले असले तरी तुरुंगवास भोगत असल्याचा भास बाकीच्या असंख्य मुलांना होत असतो...

मान्य आहे की जन्मदात्यांचा अधिकार मुलांवर त्यांच्यापेक्षा अधिक असतो आणि हे आजची तरुण पिढी जाणून आहे आणि तरीसुद्धा त्यांच्यावर निर्बंध लादण्याची गरज आहे का???.... हा प्रश्न पालकांनी स्वतःला विचारण्याची वेळ आता आली आहे.

बर्‍याचवेळा नातेवाईकांकडून 'तुमच्या आईवडिलांनी स्वतंत्रपणे किती कष्ट करून हे सार तुमच्यासाठी उभे केले आहे' हे विधान सारखे सारखे ऐकवले जाते पण समजा तेच स्वातंत्र्य मुलाला एकदा दिले तर???
जेव्हा जेव्हा मुले चुकतात तेव्हा त्याची जाणीव त्यांना करून देणे ह्यात काहीच वावगं नाही पण त्यांच्या प्रयत्नांना खतपाणी घालण्याचे काम मोठ्यांनीच केले पाहिजे आणि त्याचा फायदा पालक आणि मूल या दोघांना होऊ शकतो...

सध्यातरी माझ्या मते मुंबईमध्ये ७० ते ७५ टक्के आईवडिलांच्या काही अपेक्षा तंतोतंत जुळत असतील
त्यातली एक म्हणजे आपली मुले इतरांपेक्षा ग्रेट असावीत...
आणि दुसरी म्हणजे आपण विवाहासाठी ठरवलेले स्थळ हेच त्यांच्यासाठी योग्य आहे आणि तोच त्यांनी मानावा...

पहिली अपेक्षा पूर्ण करण्याचा सर्वच मुले प्रयत्न करतात कारण तिकडे प्रश्न असतो तो फक्त मेंदूला चालना देण्याचा (आणि कधीकधी स्वार्थीपणाचाही)
पण दुसरी अपेक्षा पूर्ण करताना कोणी क्लिन बोल्ड होतो तर कोणी रन आऊट कारण इकडे ना मेंदू चालतो ना शहाणपणा.. असतो तो फक्त आणि फक्त वेडेपणा... यावेळी शरीराला, मेंदूला आणि बहुदा आत्म्याला सुद्धा मनानेच काबीज केलेले असते आणि या वेडेपणामध्येच आपण कबुलीजबाब आईवडिलांना देतो...त्यांच्यासाठी मात्र तो अपेक्षभंगाचा झटकाच असतो...
त्यांना तो सहन होत नाही मग लगेचच मुलांना न विचारता बाकीची जुळवाजुळव सुरू होते.. मुलांच्या विरोधात जाऊन त्यांची मते न जाणता लग्न ठरवले जाते... यावेळी मुलाच्या मनात काय चालले आहे... त्याचा होकार नकार याला काहीच महत्व दिले जात नाही..अशावेळी मुलांसाठी हा अपेक्षभंगाचा झटका असु शकत नाही का??
आपल्या मुलाने/ मुलीने पाहिलेले स्थळ सारा विचार करून पाहिले असेल असे मोठ्यांना अजिबात वाटत नाही का??.. की त्यांना असे वाटूनच घ्यायचे नाही?

मुलांवर विश्वास टाकून जर त्यांची मने जिंकता आली तर त्यांच्या मनातला मोठ्यांविषयी असणारा आदर अजून खूप पटीने वाढेल यात तीळमात्र शंका नाही...जनरेशन गॅप मधला फरक जाणून घेऊन एकमेकांना समजून आणि जाणून घेण्याची वृत्ती प्रत्येकाने (मोठ्यांनी आणि तरुणपिढीने सुद्धा) मनात बिंबवण्याची गरज आहे आणि ती यापुढेही राहीलच...

अपेक्षाभंग, आत्महत्या, भांडणतंटा, घटस्फोट, मानसिक त्रास, दु:ख, क्लेश या आणि अशा गोष्टींचे ओझे कमी करायचे असेल तर एक आणि एकाच उपाय आहे तो म्हणजे समोर असणार्‍या व्यक्तीच्या डोक्यावरचे 'अपेक्षांचे ओझे' रिक्त करणे...

Thursday, May 13, 2010

चला चला गावाकडे पळा... भाग-४

बाबा आपल्याला ते कोण आहे हे फोडणी करून समजवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण सार काही समजल्यासारखे मान डूलवतो... पण आपल्याला काहीच समजले नाही हे आपल्याला आणि बहुदा बाबांनासुद्धा माहीत असते...













दोनचार घरे सोडून आता आपला वाडा दिसू लागतो... वाडा दिसताच आपण आईचा हात सोडून धावत धावत त्या दिशिने पळतो...दारातच तुळशीला पाणी घालणार्‍या आपल्या आजीला त्याच वेगाने घट्ट बिलगतो... 'आलास कारं माझ्या लेकरा' अश्या आर्त आवाजात आजी आपल्याला मिठीत घेते...मन भरेपर्यन्त मुके घेते...सार्‍याना एकत्र पाहून नकळत तिचे डोळे भरतात.. आजोबा देवघरात देवाची पूजा करत असतात....आपल्याला पाहून ते मंत्र बोलत बोलत स्मित हास्य करतात... पूर्ण वाड्याकडे नजर फिरवून आपण मागच्या बाजूच्या अंगणात जातो.... तिकडे असलेले जांभूळ आणि पेरूच्या झाडाला किती फळ लागली आहेत हे आपण पाहून घेतो... मागच्या अंगणातच हातपाय धुवून आपण पुन्हा देवघरात आजोबांकडे जातो... देवाला लावलेले गंध ते आपल्याला सुद्धा लावतात.... आणि पाठीवरुन हात फिरवतात....

थंडी वाजत असल्याने सारे आंघोळीच्या बंबाजवळ जाउन हात शेकत बसतात.... पाणी गरम झाल्यावर आई एकेकाला पाणी काढून देते..... एका बादलीत आपण आणि काकाचा एक मुलगा असे एकत्र आंघोळीला बसतो..... एकमेकांना भिजवत मजा घेत घेत आंघोळीचा कार्यक्रम शेवटी आटपतो.... आई आपल्याला कपडे घालून केसाचा भांग पाडून तयार करते.... नाष्ट्या मध्ये मुंबईवरुन आणलेले काही खाण्यापेक्षा आजीच्या हातची शेवयांची खीर, शिरा यावर सारी सेना तुटून पडते....

Tuesday, May 11, 2010

चला चला गावाकडे पळा... भाग-३

लालसर मातीचा गंध मनात दरवळतो... पायवाटेला खेटून उभी असलेली झाडी आणि हवेतला गारवा सार सार हवहवसं वाटणार.... ....आंब्याच्या झाडावरून कोकिळेचे मधुर स्वर.....चिंचेची उंच उंच झाडे एकापाठोपाठ एक दिसू लागतात....
बाजूलाच दूरवर पसरलेल्या शेताकडे नजर जाते आणि सोनेरी पिवळी कणसे आपल्या येण्याने आनंदित होऊन डोलतात की काय असा भास होतो.... आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैर्‍या पाहून तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही....
त्या तोडण्याचा मोह ' आपण नंतर येऊन तोडूया ' असा विचार करून त्या क्षणी का होईना आवरतो...

गावाच्या जवळच असणारी विहीर आता दिसू लागते... तिकडे पाणी भरणारे गावकरी आपल्याकडे पाहत असतात... त्यांच्याकडून आईवडिलांची विचारपूस सुरू होते... आई वडील त्यांच्याबरोबर बोलताना आपण लगबगीने विहिरीत डोकवतो.... हिरव्या पाण्यात आपलेच प्रतिबिंब न्याहाळताना हरवून जातो....विहिरित डोकावताना ' ओओओ ' असा जोरजोरात आवाज करतो...तेव्हा काही सेकंदाताच आपलाच आवाज पुन्हा आपल्याला येतो... काहीतरी जादुच होते आहे की काय?..असे मनात येते.... एकदाच ओरडलो तरी आवाज ३ वेळा कसा येतो हे जाणण्यासाठी पुन्हा आवाज करतो.... कान विहिरिला लावून पुन्हा पुन्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.... आईचे बोलून झाले की तिचा हात धरून पुढे निघतो....

गावातील ओळखीचे चेहेरे आता दिसू लागतात...गावात येताच समोरच मंदिर दिसते.. मंदिरासमोर मोठे वडाचे झाड ... त्याच्या पारंब्याना बिलगुन खेळणारे चिमूरडी मुले आणि सावलीत कट्यावर वृतपत्र वाचत बसलेली आजोबांच्या वयाची मंडळी...' राम राम पाव्हनं..कसं काय चाललाय??...' आई बाबांना पाहून प्रत्येकजन आमची खुशालि जाणून घेतो.... त्यातलेच कोणी आजोबा मग आपले गालगुच्चे घेतात आपण पण ओळख असल्यासारखे आईच्या पदरामागे लपून लाजत लाजत त्याना स्मित हास्य देतो... पण पुढे गेल्यावर ते कोण होते??? मी त्यांचा कोण लागतो??? ते कुठे राहतात?? असा प्रश्नांचा वर्षाव आपण बाबावर करतो .... बाबा आपल्याला ते कोण आहे हे फोडणी करून समजवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण सार काही समजल्यासारखे मान डूलवतो... पण आपल्याला काहीच समजले नाही हे आपल्याला आणि बहुदा बाबांनासुद्धा माहीत असते...

क्रमश:

Friday, May 7, 2010

चला चला गावाकडे पळा... भाग-२

सकाळी थंड वार्‍याची झुळुक अंगावर शहारा आणते... गाढ झोपेत असलेलो आपण स्वतः जागे होऊन खिडकीतून बाहेर डोकवू लागतो. आजूबाजूला पडलेले धुके आणि त्यातून पूसटशी दिसणारी हिरवीगार झाडी असा नयनरम्य परिसर पाहून डोळे दिपून जातात.

गाडी स्थानकावर येऊन थांबते... बाबा आवाज देतात बेटा चला उतरायचे आहे... पुन्हा खेळण्यांची बॅग हातात घेऊन आपण खाली उतरतो... बस स्थानकावरच्या हॉटेल मध्ये बाबा घेऊन जातात... कोण कोण काय काय खाणार??? असे विचारताच एक एकाची फर्माईश सुरू होते.... कोणाला गरमागरम भजी हवी असते...कोणाला बटाटा वडे, समोसे...तर कोणी मिसळ वर ताव मारतो...सर्व खाऊन झाल्यावर गरमागरम कटिंग चहा पिऊन सारे तृप्त होतात...

त्यापुढचा प्रवास जीपने होणार असतो... जवळजवळ १२/१३ माणसे असूनसुद्धा त्याचा ड्राइवर जायला तयार नसतो.... साहेब अजुन ४ सीट होऊदेत मग हलवतो गाडी... गाडी म्हणजे जणू कोंबड्यांचा खुराडा होऊन जातो... अजुन ४ सीट बोलून ६ जण गाडीवर स्वार होतात... ड्राइवर गाडीच्या अर्धा बाहेर जाउन गाडी कसा चालवतो हे त्याचे त्यालाच माहीत... कच्या रस्त्यावरून जाताना गाडीपेक्षा माणसाचेच पार्ट जास्त हलतात....या सार्‍या गर्दीमध्ये आपले लक्ष मात्र बाहेरच असते... गावाकडची वाट आपल्याला साद घालत असते.... आंब्याची, चिंचाची झाडे दिसायला हळूहळू सुरूवात झालेली असते... या पुढच्या २० मिनिटांच्या प्रवासात आपण विचारण्याच्या आतच आई आपल्याला 'आता आलेच हा आपले गाव' असे कमीत कमी १०/२० वेळा बोलून मोकळी होते...

गाडी गावच्या फाटकापाशी येऊन थांबते... बाहेर येताच आपण २ मिनिटांच्या अंतरावर वसलेल्या आपल्या छोट्याश्या गावाकडे हसरी नजर फिरवतो.... गावातले मंदिर आणि त्यावर फडकणारा भगवा झेंडा, जुनी कौलारु घरे, आणि लालसर मातीत न्हाहून निघालेली पायवाट, हिरवी पिवळी झाडे....सारे सारे आपल्या स्वागतासाठी सजले आहेत की काय असा भास होतो...

क्रमश:

Thursday, May 6, 2010

चला चला गावाकडे पळा...भाग-१

उन्हाळ्याच्या सुट्टी लागली रे लागली की .....ह्युरे चला चला गावाकडे पळा....बालपणीचा हा आनंद आजही तितकाच ताजा आणि सच्चा वाटतो.... आपण कितीही मोठे झालो ना तरीही त्या आठवणी अजुनही तश्याच्या तश्या मनाच्या कोपर्‍यात घर करून असतात...असेच काही क्षण माझ्या आठवणीतले... कदाचित ते तुम्हाला तुमचेही वाटतील...

बाबांनी तिकीट बुक केले हे समजताच बॅग भरायला सुरूवात होते.. सापशीडी, बॅटबॉल, छोट्या छोट्या गाड्या, भातुकलीची खेळणी सार काही जमवायला लागतो आपण... कपड्यांची बॅग कोणाकडे ही असू देत पण खेळण्यांची बॅग मात्र आपल्याला आपल्याच हातात हवी असते... काका मामा ची मुले आपल्या बरोबर येणार यामुळे आपली स्वारी जास्तच खुशीत असते....

एसटी स्टॅंड ला जावुन उभे राहीले की, 'बाबा आली का गाडी' हा प्रश्न कमीत कमी ५० वेळा विचारून होतो...गाडी आली की धावत धावत जाउन खिडकी पकडायची....गाडी कधी चालू होते यासाठी ड्रायव्हर कधी येतो याकडेही बारीक लक्ष असते...

गाडी चालू झाली की आपल्या जिवात जीव येतो... रस्त्यावरची उलटी पळणारी घरे, दुकाने पाहून खूप गंमत वाटते....
रात्रीचा प्रवास म्हणजे त्यावेळी एक पर्वणीच असते....गाडीने मुंबई सोडली की आई लगेच आपल्या अंगावर स्वेटर चढवते.. बाहेर पाहणारे आपण आता नकळत हळूहळू डुलकी खावू लागतो.... आईच्या कुशीत झोप कधी येते समजत पण नाही...

बेटा उठा उठा ... बघ बघ घाट आलाय... आपण लगेच डोळे चोळत चोळत बाहेर पाहतो.... बाहेरचा परिसर पाहून आपण हे सारे आवाक होऊन पाहत असतो....सोन्याची दुनिया असल्याचा भास असतो तो...कोणता तरी उत्सव आहे का हा??? क्षणभर प्रश्न पडतो मनाला... चारही दिशा काळोखाने भरलेल्या, आकाश नीर्भ्र आणि मध्येच खोलवर पिवळी पिवळी तोरणे जी लांब लांब पसरलेली दिसतात... थोड्याच वेळात पुढे बोगदा येतो त्यातून जाताना आपण जमिनिखालून जातोय की काय असाच काहीसा अनुभव येतो... बोगदा संपला तरी मागे वळून वळून तो दिसत नाही तो पर्यंत त्याला न्याहाळत राहतो...

सारा सारा आनंद डोळ्यात सामावून स्मित हास्य घेऊन पुन्हा आपण आईच्या कुशीत निजतो... नेहेमी तहान भूक लागल्यावर रडणारे आपले पिल्लु सार सार विसरून शांत झोपलेले पाहून आई मिठीत घेऊन गोड गोड मुका घेते....

क्रमश:

Wednesday, May 5, 2010

सामान्य माणूस...

दादर..दादर... बांद्रा जाएगा...सायन ला सोडले तरी चालेल..... अरे यार अंधेरी नही तो पार्ले तक छोड दो....
नही साब वहा पे ट्रॅफिक बहुत है.. मैं अभी खाना खाने जा रहा हूँ... ३०० रुपये होंगे मीटर से नही आउन्गा....
टॅक्सी टॅक्सी.. अबे साले सुनते भी नही, ये हमारे लिये है या हम इनके लिये... दिमाग की दही करते है....
या सर्वाना पोकळ बांबुचे फटके द्यायला पाहिजेत... बाकी वेळी ठीक आहे पण अशा वेळी तरी यांनी ऐकले पाहिजे ना...
नाहीतर काय.... अहो आमच्या सोसायटी मध्ये चला बोलले की लगेच थोबाड वाकडी करतात ही लोक.....
टॅक्सीवाले, ऑटोरिक्षा वाले आणि सामान्यमाणूस यांच्यातली खडाजंगी...

कालच्या दिवसात एक एक संभाषण ऐकण्यासारखे होते... जितके हसायला येत होते त्यावेळी तितकेच डोक्यात विचार चक्र जोरजोरात फिरत होते... हा त्रास तसा नेहेमीचाच आहे... पण जेव्हा कधी आपत्कालीन स्थिती निर्माण होते तेव्हा त्याची जाणीव अधिक प्रमाणात होते... मग त्यावर सोल्यूशन नाहीच नाही हे लक्षात आल्यावर आपण एकटेच बडबडतो किंवा समोर जो कोणी असेल ( आपली आवडती व्यक्ती असेल तिलाही फुकट आणि तिच्या मनात नसताना सुद्धा ) तिला हे सर्व ऐकवतो... कधी कधी हा राग इतका अनावर होतो की एकाचा राग दुसर्‍यावर निघतो ( बिचारा त्याची चुकी नसताना सुद्धा )... आणि आपण मगाशी का रागावलो हा विचार करून पुन्हा आपण स्वत:वर चिडतो.....फाइनली पच्याताप करण्याची पाळी आपल्यावर येते...

एकूण काय आपण क्रांती आणण्याचा फक्त आणि फक्त विचार करू शकतो .... आणि समजा जर आणण्याचा प्रयत्न केला तर समोरचा आपल्याला वेड्यात काढतो... आपल्याला कोणी वेडा बोलला हे आपल्याला कसे चालणार बरे???.... म्हणून आपण सुद्धा असल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो... कधी कोणी चुकीचे वागतोय हे समजल्यावर मनातल्या मनात समोरच्यावर चिडतो..त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहतो... आणि काही करू शकणार नाही हे समजल्यावर काही झालेच नाही असे समजून सार काही विसरून जातो....

राजकीय पक्ष तर घडाळ्याच्या काट्यापेक्षा फास्ट....एका एका मिनिटांनी शब्द बदलतात (पक्ष बदलल्याप्रमाणे)....माझ्यामते आपण बहुदा त्यांच्यापेक्षा फास्ट आहोत ते जितक्या लवकर निर्णय बदलतात ना आपण तितक्या लवकर मनातल्या मनात पलटी मारतो आणि पुन्हा समोर जो कोणी असेल त्याला (ज्याला या कशातच इण्टरेस्ट नसतो त्याला) हे होणारच होते मला माहीत होते असे बोलून स्वत: ला सर्वांसमोर मिरवतो.. आणि त्यातच आनंद मानतो... तसे पण सध्या या कन्न्डीशन ला बिचारा सामान्य माणूस इतकेच करू शकतो....

Tuesday, May 4, 2010

चक्का जाम

मोटरमेनच्या 'उपाशी' आंदोलनामुळे मुंबई बेशुद्ध
लाखो लोक रस्त्यावर
ना लोकल... ना रिक्षा... ना बस...
मोटरमन संपामुळे प्रवाशांचे हाल
दिलासा 'एनएमएमटी'च्या १०० बसचा!
मध्य-पश्चिम-हार्बर रेल्वेसेवा ठप्प!
संपामुळे मुंबईच्या 'लोकल'ची रखडपट्टी
मुंबईच्या लोकलला लागणार 'उपासा'चा ब्रेक!
अत्यावश्यक असेल तरच प्रवास करा!
प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त १०० बस
बेस्ट, रेल्वे, मोनो, मेट्रोसाठी एकच तिकीट

एका दिवसात इतक्या हेडलाइन्स (सॉरी ब्रेकिंग न्यूज़) बापरे!!!!!!!!!
आंदोलनात कोण कोण बेशुद्ध पडले माहीत नाही पण हे वाचून माझे डोके तर नक्कीच गरगरु लागले आहे. पहिली गोष्ट म्हणजे आंदोलन नक्की का चालू आहे हेच नीट माहीत नसल्याने मी तरी या रेल्वे कर्मचार्यांना नको नको ते बोलून झालो होतो.
(इन शॉर्ट शिव्या देऊन झालो होतो) आज सकाळीच वाचले मी की, ' मोटरमन संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सहाव्या वेतन आयोगाने मोटरमनचा ग्रेड पे वाढवावा, अशी शिफारस केलेली आहे. ग्रेड पे ४२०० रुपयांवरून ४८०० रुपये करण्याची मागणी आहे. ग्रेड पे वाढवल्याने रेल्वेवर फार मोठा बोजा पडणार नाही. किलोमीटर अलाऊन्स वाढवण्याचीही मागणी आहे. त्याशिवाय मोटरमनसोबत सहायक मोटरमन देण्याची मागणी आहे.'

ह्म्म्म्म... तर असे आहे सर्व.... यांच्या मागण्या सरकार ने ऐकल्या का कधी??... त्यावर काही तोडगा काढला का कधी ???.... पण या मागण्या पूर्ण केल्या नंतर पुन्हा ह्यानी अजुन नवीन मागण्या घातल्या तर??...
एका प्रश्नाचे उत्तर मिळाले की नवीन प्रश्न..... माणसाची सर्वात जवळची सवय किंवा खोड म्हणा... आणि मीही त्यातलाच एक...

रस्त्यावर ट्रॅफिक जॅम, मोबाइलचे नेटवर्क जॅम, गरमिने माणूस जॅम या सार्‍या त्रासाने माणसाचे डोके जॅम
मी काय लिहितोय याचा मेळ बसत नाही कारण सध्या परिस्थिती तशीच आहे...डोक्यात विचारांचे अणू रेणू तयार झाले आहेत
आणि चक्रिवादळासारखे घोन्गावत आहेत इकडून तिकडे....


कालपर्यंत रेल्वेच्या पाठीशी उभी असणारी काही राजकीय मंडळी आज बाहेर पडली आहेत आणि लोकांना वेठीस धरू नका असे सांगत आहेत... बिचारे रेल्वे वाले ना घर के ना घाट के अशी परिस्थिती झाली असेल त्यांची... काही नेत्यांचे वेगळे चालू आहे की आंदोलन बंद करा नाहीतर आम्ही आमचे आंदोलन करू... आधीच लोकांच्या डोक्यात तांडव चालू आहे त्यात तुमची मारामारी कशाला रे.... काय रे देवा...

आज दुसरा दिवस तरीही संप चालूच आहे कधी संपणार वाट पाहतोय...कसाबला काय शिक्षा होणार याची सुद्धा वाट पाहतोय... डोक्यामध्ये याशिवाय कामाचे वादळ गोल गोल गुमवते आहे याचा मात्र फक्त आणि फक्त त्रास होतोय...