Wednesday, March 25, 2020
परीक्षित
Friday, November 3, 2017
आरुषी
26 नोव्हेंबर 2013. तलवार कुटुंबियांना जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर त्यांनी केलेल्या कृत्याची india today मध्ये चित्रासहित पान भर आलेली, वाचलेली बातमी मला आठवते आहे... समाज कुठे चालला आहे? आई बाबाच आपल्या मुलीला मारू शकतात? घोर कलयुग आलाय... असा विचार डोक्यात आला... त्यानंतर अनेक दिवस वाहिन्यांची ही कव्हर स्टोरी होती आणि प्रत्येकाने आपला टीआरपी वाढवला... हे हत्याकांड, ही घटना 16 मे 2008 रोजी घडली आहे हे मला आता कळलंय... काही काळाने मी सुद्धा ही घटना सामान्य माणसासारखा विसरून गेलो...
त्यानंतर 2015 ला आलेला "तलवार" हा चित्रपट मी पाहिला... आतापर्यंत मी इतके चित्रपट पाहिले असतील पण हा पहिला असा चित्रपट होता जो पाहून मी खूप अस्वस्थ झालो हे असे चित्रपट काढुच नये असं मनात आलं... पण त्यावेळी एक गोष्ट कुठेतरी मनात कोरली गेली की तलवार कुटुंब निर्दोष होतं... तो चित्रपट पाहिल्यानंतर मी गुगल ला जाऊन बरेच मुद्दे वाचले त्यात मीडिया ने या केस मध्ये किती इंटरेस्ट घेतला होता हे लगेचच लक्षात येईल. Ipl ला जितका टीआरपी नव्हता तितका तलवार यांच्या केस मुळे न्यूज चॅनेलस ला होता हे "आरुषी" पुस्तकात मांडलंय. कधीकधी मीडिया सीबीआय च्या पुढे जाऊन आपलं शातीर डोकं लावून आपली मतं स्वतःच तयार करत होती हे मला बऱ्याचवेळा ब्रेकिंग न्यूज मध्ये जाणवत होते. 2015 वेळीच अजून एक चित्रपट आला "रहस्य" नावाचा तो सुद्धा मी पाहिला.. तलवार कुटुंबाने तो रिलीज करू नये असे वाचनात आले होते त्या चित्रपटात आईनेच मुलीची हत्या केली हे दाखवण्यात आले होते... पण रहस्य चित्रपट मला उथळ वाटला, खोटा वाटला जसं मी "आरुषी" पुस्तकात डॉ दहिया आणि सीबीआय च्या काही अधिकाऱ्यांनी (ए. जी. एल. कौल) यांनी मनाला सुचलेली, एखादी रचलेली कथा तयार केली होती अगदी तसाच...
मला आठवतंय 2015 च्या दरम्यान मी एक मित्राशी या विषयावर बोललो होतो त्यावर तो एकदम ठामपणे बोलून गेला अरे तुला माहीत आहे का त्या तलवार कुटुंबानेच हे मर्डर केले आहेत... तो इतका कॉन्फिडन्स ने बोलत होता जणू तो प्रत्यक्षदर्शी होता. मला आश्चर्यच वाटलं आणि काही क्षणासठी असेल सुद्धा असं देखील वाटलं... आपल्याला एखादी घटना 10 ठिकाणी त्याच पद्धतीने दाखवली गेली, सांगितली गेली आणि कानावर पडत राहिली तर आपण सुद्धा जास्त विचार न करता, अभ्यास न करता ती घटना अशीच असेल असा समज करून घेतो. उदाहरण द्यायचे झालं तर विद्यार्थ्याला शाळेत जे शिक्षक शिकवतात ते योग्यच असते असा प्रत्येक विद्यार्थांचा समज असतो त्यात काही चुकतं असेल तरी त्यांना उलटून प्रश्न विचारणारे विद्यार्थी बोटावर मोजता येण्यासारखेच... आणि जरी विचारलाच तर तू शिक्षक आहेस की मी? तुला जास्त कळतं का? असे सवाल येण्याची आणि मार मिळण्याची भीती वेगळीच... आपल्यापेक्षा अनुभवाने आणि वयाने जास्त असलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे हा पर्याय अगदी सहजतेने आपण अंगीकारला आहे...
फिझा झा या आरुषीच्या मैत्रीनीने 12 ऑक्टोबर 2017 रोजी लिहिलेला लेख मी वाचला आता ती 21 वर्षाची झाली आहे. आरुषी खून होण्याच्या आदल्या दिवशी तिच्याकडे गेली होती. हा लेख वाचल्यावर मनात एकदम पक्क झालं की तलवार कुटुंब निर्दोष आहे तरीही फिझा ने शेवटच्या काही ओळींमध्ये लिहिलं होतं की अविरुक सेन यांचे "आरुषी" हे पुस्तक खूप महत्वाचे आहे... त्यानंतर लगेचच मी हे पुस्तक वाचायला घेतलं.. तिने लिहिलेल्या लेखाची लिंक इथे देतोय https://www.thequint.com/news/india/aarushi-was-bubbly-jumping-at-my-house-a-day-before-her-death
आज "आरुषी" हे पुस्तक वाचून झालं... हे पुस्तक वाचल्यावर आपली न्यायव्यवस्था किती कमकुवत आहे असे म्हणण्यापेक्षा ही केस ज्या प्रकारे हाताळली गेली त्या बद्दल कीव येतेय... राग येतोय... पूर्ण पुस्तक जरी कोणी वाचलं नाही आणि शेवटी ज्या न्यायाधीशांनी तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावताना दिलेल्या 26 गोष्टीची यादी जरी वाचली तरी ती कोणत्याही सामान्य माणसाला न पटणारी अशीच आहे...
अविरुक सेन यांनी कोणाचेही नावं न बदलता हे पुस्तक जे सत्य समोर दिसतंय त्याप्रमाणेच लिहिलं आहे आणि म्हणूनच पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे ते एकदम खरे वाटतं... या खटल्यावेळी अविरुक सेन प्रत्यक्षरीत्या तेथे हजार होते त्यामुळे हरेक गोष्टीचा बारकाव्याने अभ्यास करून त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे हे वाचताना क्षणोक्षणी जाणवत.
राजेश तलवार यांनी पुस्तकाच्या तिसऱ्या भागात कारागृहात लिहिलेली डायरी ते निर्दोष असल्याची खात्री देते आणि त्यांना किती भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागले हे आपल्याला कळते... ज्यांना वाटतं की तलवार कुटुंब निर्दोष होतं आणि ज्यांना वाटत दोषी होतं त्या सर्वानीच हे पुस्तक न विसरता वाचा... कारण हे वाचल्यानंतर आजूबाजूला घडणारी घटना जशी दिसते जशी दाखवली जाते तशी असेलच असे नाही असे आपल्याला कळू लागते आणि त्यावर आपलं मत आपण सहजासहजी कोणासमोर पण व्यक्त करताना, एखादे भाष्य करताना 10 वेळा तरी विचार करू इतकं नक्की...
मी हे पुस्तक वाचायला घेतल्यानंतर काही दिवसातच तलवार कुटुंबाविरुद्ध आवश्यक असे पुरावे नसल्याने त्यांची सुटका करण्यात आली हे वाचनात आले. मनाला खरंच खूप समाधान वाटले... पण याचबरोबर मनात विचार आला त्यांची गेलेली 9 वर्ष त्यांना परत मिळू शकतात का? खरे गुन्हेगार कधी सापडतील का? समाजात तलवार कुटुंबाला आधीचे स्थान आणि मान पुन्हा मिळेल? आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांची लाडकी, त्यांना जिवाहून प्रिय असलेली त्यांची आरुषी त्यांना परत मिळू शकते का? या केस मध्ये अनैतिक संबंध, बलात्कार असे बरेच आरोप प्रत्यारोप आलेत... पण तलवार परिवारावर न कळत सर्वांनीच मग ती सीबीआय असो, मीडिया असो किंवा सामान्य जनता असो लाखो वेळा तो केलाय.
ज्याला कोणाला सत्य जाणून घ्यायचे असेल त्यांनी नक्की " आरुषी" हे पुस्तक वाचा...
Thursday, November 2, 2017
तो आणि ती
तो घरात एकटा बसला होता
ती आज लवकर येणार या आनंदानं त्याच्या चेहेऱ्यावर नकळत स्माईल येत होतं...
तसं तो तिला रोजच भेटतो...
ती रोज ऑफिस वरून आल्यावर दोघे एकत्र वेळ घालवतात...
खरतर रोजरोजच्या त्याच त्याच जगण्याचा भेटण्याचा आजकाल कंटाळा येऊ शकतो...
कधी कधी या दोघांनाही येतोच म्हणा..
तरी तिचं फक्त सोबत असणं त्याला सुखावत त्याला हवंहवंसं वाटत
म्हणूनच की काय लग्नाला इतकी वर्ष उलटल्यानंतर सुद्धा त्यांचं प्रेम कमी झालं नाहीये...
आता काही वेळापूर्वीच तिचा मॅसेज आला की ती उशीरा येणार आहे तिचा कोणीतरी मित्र तिला भेटणार आहे...
थोडं उदास वाटण्यासारखं असंच काहीसं आहे म्हणा पण तरीही मगाशी म्हंटल्याप्रमाण कधी न कधी एकमेकांचा कंटाळा येऊ शकतो ना? असं यानं आज मनाला समजावलं आणि तिला जाण्याची संमती दिली... सहजसहजी नाही हा त्याला हे आवडलं नाही हे त्याने तिला सांगितलंच पण त्यातही त्याला तिची किती ओढ आहे हे कळावं म्हणून फक्त...
तिला सुद्धा असेलच की त्याची ओढ ? फक्त तिने ते व्यक्त केलं नाही इतकंच...
बाकी दोघांचं प्रेम मात्र तसंच चिरतरुण... पहिल्या भेटीसारखं नसेल कदाचित पण मुरलेल्या गोड लोणच्यासारखं... 😄😄😄
शरीरसुख
तिने विचारलं आपल्यात सेक्स करून किती दिवस झाले अशा वेळी पटकन काय बोलायचं हे सुचायला हवं ना बर सेक्स किती वेळा होतो त्यापेक्षा कसा होतो ते महत्त्वाचं... भले तो काही दिवसांनी महिन्यांनी किंवा वर्षाने होउदे पण त्यातलं नावीन्य टिकलं तर गंमत... शेवटी शरीरसुख म्हणजे शरीराचे चोचले पुरवणचं नाही का?? भले भले यात अडकून पडले आहेत ... आयुष्याची घडी बसलेले, विस्कटलेले, त्याच्या मोहापायी वाया गेलेले... शरीरसुख मिळत असेल, समोर आ वासून असेल तर कोणता पुरुष नको बोलेल?...
माझ्या ओळखीतल्या एक लग्न झालेल्या मित्राने कॉलर टाईट करून सांगितलेला किस्सा मला नेहेमी आठवतो आठवतो म्हणण्यापेक्षा त्रास देतो
मला तो सांगत होता, अरे मेरी लाईफ आणि मेरी वाईफ फुल धमाल आहे।।। ऑफिस वरून घरी आल्यावर मी फ्रेश होतो मस्त बायकोने जेवण केलेलं जेवतो ती सर्व घर आवरते भांडी घासून रात्री झोपायला येते तिला झोप आली असेल नसेल मला मात्र रोज सेक्स करायचा असतो 2 ते 3 वेळा तरी खाली झालो पाहिजे तर मजा... मी विचारलं अरे पण तिची इच्छा नसेल तरीही? तो निर्लज्जा सारखं बोलला भाई हक्काची बायको आहे हवंय म्हणजे हवंय द्यावं लागणार तिला... हा तिच्यावर केलेला बलात्काराचा प्रकार माझा मित्र मला छाती फुगवून सांगत होता आणि मी फक्त नंदी बैलासारखा मान डोलवत होतो...
जगातल्या सुंदर दिसणाऱ्या हॉट दिसणाऱ्या सेक्सी फिगर पासून वाईल्ड सेक्स ची आवड असणाऱ्या स्त्री सोबत आपण सेक्स करावा हा किमान 10 पैकी 9 पुरुषांचा विचार किंवा विकार असेल. याविरुद्ध स्त्रियांचं प्रमाण 50-50 असू शकतं आणि त्यातही त्या व्यवस्थित विचार करून खरंच समोरच्याशी तितकं attraction असेल आणि जर खरंच सार काही जुळून आलं तर ते साध्य...मात्र पुरुषांचं घोड ताशी 100 च्या स्पीड ने धावणार...
तरीही कुठे ना कुठे आपण आपल्या माणसाशी जोडलो गेलेलो असतो.. आपल्याला हवी असणारी गोष्ट जो पर्यंत मिळतं नाही तोपर्यंत तिचं नावीन्य ती मिळाल्यावर तीचं महत्त्व सर्वसाधारणच... एकापेक्षा जास्त ठिकाणी शरीरसुख उपभोगण चुकीचं नसेल कदाचित पण तरीही आपल्या व्यक्तीसोबतचा सहवास, त्याच्याशी असलेलं बॉंडिंग, त्याच्या सुगंध, त्याचा सहवास आणि शरीरसुख अनुभवल्या नंतर त्याचं घट्ट मिठीत असणं काही औरच...
Thursday, September 21, 2017
विकृती
लाखो लोक आणि त्यांच्या डोक्यात असलेले करोडो विचार.. अस्वस्थ करणारे, विचार करायला लावणारे, हसवणारे, स्वतःचच हसू करू घेणारे... चीड आणणारे असे अगणिक...
स्वतःच वेगळेपण टिकवून ठेवणाऱ्यांपासून ते आपला टिकाव टिकून राहावा म्हणून धडपडणारे... सोशल मीडिया वर प्रसिद्धी मिळत रहावी जास्तीत जास्त लाईक आणि कॉमेंट्स मिळाव्या म्हणून किमान 12 ते कमाल 20 तास ऑनलाईन असणारे...
नक्की काय हवंय आपल्याला? काय शोधतोय आपण? कुठे जायचे आहे आपल्याला? काय कमवायचे आहे?
आज परेल येथे जी दुर्घटना घडली त्याचा विडिओ सर्व न्यूज वर दाखवतायत त्यात अनेक लोक आपल्या मोबाईल वर व्हिडीओ करताना दिसतायत...
कोणीतरी दुःखात आहे, कोणीतरी मरतोय, कोणावर तरी अतिप्रसंग ओढवतोय आणि त्यावेळी व्हिडीओ करणारे असे सामान्य आहेत का? नक्की सामान्य म्हणायचं का त्यांना? तुमच्या समोर एखादी दुर्घटना घडत असताना तुम्ही इतकं नॉर्मल राहू शकता? मन अस्वस्थ होतं असं काही दिसलं की पाहिलं की माणूस माणुसकी विसरतोय की घाबरतोय मदतीचा हात द्यायला काहीच कळत नाहीये...
एखाद्या घटना स्थळी मोबाईल वर विडिओ करत बसणं ही खरंच एक विकृती आहे यावर वेळीच आवर घालता आला पाहिजे... आपण नकळत या गोष्टींचं व्यसन लावून घेतलं आहे समाजासाठी आपण जरी काही करू शकलो नाही तर निदान समाजाला घातक ठरेल अश्या गोष्टी तरी टाळा...
Thursday, March 17, 2016
नवी सुरुवात
तसं रोज लिहावस वाटत पण खूप जास्त बिझी झालोय ( हे आपलं उगाच हा... खर तर आळस भरलेला हो... अजून काही नाही ) असो!...
आपल्याला हव ते करायला मिळण्यासाठी नशीब लागत (मेहेनत, चिकाटी हि)... ते मिळालं तर मात्र त्यातून मिळणार आनंद शब्दात मांडण कठीण तो फक्त अनुभवता येतो बस्स... पण मनाला जे हवं ते केल्यावर पुढे काय ? म्हणजे हवं ते केल ते उत्तम झालंय तरी त्यातून साध्य काय करायचे आहे... आपलं धेय्य नक्की काय आहे... याचा विचार केला पाहिजे... कसंय आपण नकळत आपल्याकडून सुद्धा अपेक्षा ठेवण सुरु करतो म्हणून...
मला आठवतंय मी या आधी पण "अपेक्षा" या विषयावर ब्लॉग मध्ये लिहिले होते... प्रत्येक माणसाचे हे असेच होते पूर्वापार चालत असलेल्या ग्रंथापासून, साहित्यातून, लेखकांच्या लेखणीतून किंवा अनेक बाबांच्या प्रवचनातून सर्व हेच ऐकायला, वाचायला मिळत की " कर्म करा फळाची अपेक्षा करू नका, अपेक्षा ठेवू नका कारण अपेक्षा पूर्ण नाही झाल्या कि दुखः होत... तुम्ही फक्त चालत रहा बाकि सर्व देवावर सोडा" अस आणि बरच काही... तरीही आपण अपेक्षा ठेवण काही सोडत नाही कधी त्या आपल्या माणसांकडून असतात किंवा दुसऱ्यांकडून...
यातल्या बऱ्याच गोष्टी माझ्याशी निगडीत आहेत म्हणून मुद्दाम मी लिहितोय... गेल्या २ ते ४ महिन्यात मी दोन लघुपट केलेत खूप काही शिकतोय एक दिग्दर्शक म्हणून परिपक्वता आणण्याचा प्रयत्न करतोय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घडणाऱ्या घटनांमधून एक चांगला माणूस बनण्याचा सुद्धा प्रामाणिक प्रयत्न करतोय... तरीही असे वाटत राहत कि आपण करतोय तो मार्ग योग्य आहे का ? अजून काही केले पाहिजे का ? कुठे कमी पडतोय का? अति आत्मविश्वास तर नाही ना आलाय?... हे आणि असे अनेक प्रश्न मनाला पडतात...
कधी कधी मन घाबरत... मनात चलबिचल होते... हृदयाचे ठोके अचानक वाढतात... काहीतरी चुकतय असं वाटू लागत... हसाव कि रडावं काही कळत नाही... हे असे होऊ लागलं कि अचानक लक्षात येत कि छ्या... या विषयांमध्ये अडकून वेळ निघून जातेय... आणि मग नवीन सुरुवात करावीशी वाटते अगदी मनमोकळे पणाने...
एक मात्र नक्की अनुभव तुम्हाला खूप काही देऊन जातो ते चांगले असो वा वाईट... म्हणून कि काय वर लिहिल्याप्रमाणे मी अपेक्षा ठेवण कमी केलय ( अपेक्षा ठेवण बंद करण्यासाठी वेळ जाईल )... जे मनात आहे ते तसाच्या तसं जगासमोर मांडायचे मस्त एकदम... त्यानंतर त्याचा result काय असेल याची पर्वा सोडायची... हे एकदम मनात पक्क केलय ... म्हणूनच एक नवीन सुरुवात करतोय नव्याने...
Tuesday, June 26, 2012
स्वप्नांची घरटी
Monday, June 18, 2012
शोध स्वतःचा...
विचार करत रहायचं?...
स्वतःला आरशात पहायचं?...
की इतरांसारख मुखवटा लावून गल्लोगल्ली फिरायचं?...
स्वतःचा शोध घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचं?
जीवनाच्या वाटेवर हा प्रश्न आपली पाठ काही सोडत नाही... तो आपल्या सोबत कायम सावलीसारखा असतो...
कधी दुखः डोंगराएवढ असत.. कधी आत्मसन्मान दुखावला जातो... तर कधी आपला वाटणारा माणूसच आपल्या पाठीत नकळत खंजीर खुपसतो... आणि मग आपण कोण आहोत? आपल्या सोबतच अस का घडतं? आपलं काय चुकल... याची बेरीज वजाबाकी आपण करतो... आणि मग स्वतःचा शोध घेण्याचा फसवा प्रयत्न नेहेमी करत राहतो...
अशावेळी नक्की कसं वागायचं?... काय करायचं? हे आपल्याला समजत नाही... आपण त्या द्वेषात नको ते करून बसण्याची शक्यता अधिक दाट असते...
हे कसं टाळता येईल?
स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा शोध कसा घेता येईल?
आपण केलेल्या चुका तर आपल्याला टाळता आल्या नाहीत पण त्या पुन्हा होऊ नयेत यासाठी आपण काय करावं?... याचा विचार नक्कीच आपण करू शकतो...
आणि या सर्वासाठी एक अशी व्यक्ती हवी ज्याला आपण तो सन्मान बहाल करू... त्या व्यक्तीवर विश्वास आणि श्रद्धा ठेवू...मग तो आपला मित्र असेल... आपले आई वडील असतील... शिक्षक किंवा गुरु असतील...
त्यावेळी मात्र त्या व्यक्तीच सार काही ऐकून त्यावर विचारमंथन करण्याची गरज नितांत गरज असते... त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध ही असतील पण त्या आपल्या भल्याच्याच असतील यावर विश्वास हवा... भगवान श्री कृष्णानी सुद्धा जेव्हा अर्जुनाचा रथ कुरुक्षेत्रावर नेला तेव्हा समोर आपले नातेवाईक आपल्या विरुद्ध लढाईला उभे आहेत हे पाहून अर्जुन सुद्धा काही क्षणांसाठी चलबिचल झाला होता आपलेही असे होऊ शकते... पण भगवंतावर असलेल्या भक्ती आणि श्रद्धे कारणच तो भगवतगीते सारखा महान उपदेश ऐकू शकला... आणि त्याला त्याचा मार्ग गवसला...
शरण गेल्याशिवाय जीवन वा मरण उमगणार नाही...
आज जरी पैसा माणसाजवळ असला तरीही आपल्याला आयुष्यात नक्की काय हवं?... कोणत्या गोष्टीची आपल्याला जास्तीत जास्त गरज आहे?... आणि याही पेक्षा महत्वाचे म्हणजे आपल्याला नक्की काय कमवायचंय याचा शोध घ्यायला हवा...
प्रश्नाला उत्तर असत आणि सुरुवातीला शेवट...
आपल्या हातात एकच आहे...
शेवट गोड कसा होईल याचा विचार करून प्रत्येक पाऊल टाकत रहायचं...
Thursday, February 2, 2012
लहानपण देगा देवा
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण
वाह तुकारामांच्या या ओळी खरंच खूप काही सांगून जातात... आयुष्य जगताना लहान होऊन जगलो तर खूप काही शिकू शकतो... 'लहान होऊन मोठेपणा मिळवणे' याहून वेगळे नाही...
आजच्या धावपळीच्या जीवनात नक्की काय कमवायचे हे जर माहित असेल तर चेहेरा कायम टवटवीत, हसरा आणि निरागस अगदी लहान असताना होतो तसा राहू शकतो...
बालपणात आपण समोरचा व्यक्ती काय करतोय हे पाहून त्याचे शब्द ऐकून तसा वागण्याचा प्रयत्न करतो मग ते चुकीचे आहे कि बरोबर हे आपल्याला त्या वयात समजत नाही... पण आपण जसजसे वयाने मोठे होतो तेव्हा चूक काय किंवा बरोबर काय याची जाणीव होऊ लागते... तरीही समोरची व्यक्ती चांगली किंवा वाईट छाप आपल्यावर सोडून जात असतेच...
आणि हीच शिकण्याची प्रक्रिया शेवटच्या क्षणापर्यंत जपता आली पाहिजे...
लहान राहूनच शिकले तर त्याचा परिणाम जास्त आणि योग्य दिसतो कारण तुकारामांच्या वरच्या ओवीनुसार जेव्हा आपण एखादे कार्य करताना मोठेपणा मिरवायला जातो तेव्हा त्याचंबरोबर 'अहंकार, अति आत्मविश्वास' घातक ठरतो. ते कार्य आपल्या मनासारखे न झाल्याचा त्याचा त्रास आपल्यालाच होतो... आणि मग मनावरचा ताबा सुटून चीडचीड तणाव वाढत जातो..आपल्याला सर्व येते हे मनात आले कि आपली प्रगती खुंटते...
आपले बालपण परत मिळू शकत नाही पण आपल्यातल्या त्या निरागस लहान मुलाला जपण्यासाठी आणि पाय कायम जमिनीवर ठेवण्यासाठी संत तुकारामांचा हा पूर्ण अभंग ...
लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥३॥
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥४॥
तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ॥५।।
- संत तुकाराम
Thursday, March 31, 2011
'प्रेमभंग' - संभाषण
Saturday, March 5, 2011
'तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलंसं गाव'
Thursday, May 27, 2010
' एक अंत आत '
एखाद्या व्यक्तीचे विचित्र वागणे, मन दुखावणे, सोडून जाणे या आणि अश्या असंख्य गोष्टी ज्याने मन बेचैन होते आणि मग आपल्याला हवा असतो तो फक्त आणि फक्त एकांत...
एकांत चांगला की वाईट?? यावर प्रत्येकाचे वेगळे वेगळे मत असु शकते... पण तो सर्वांना हवा असतो हेही तितकेच खरे... कधी कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी, त्रास देणारे क्षण विसरण्यासाठी... आयुष्यातली न सुटणारी कोडी सोडवण्यासाठी...तर कधी सार्याचाच कंटाळा येऊन फक्त आणि फक्त एकट राहण्यासाठी.. अश्या असंख्य कारणांसाठी प्रत्येकाला एकांत हवा असतो...भारताची लोकसंख्या पाहिली तर अशी किती कारण असतील याचा विचार न केलेलाच बरा नाहीतर त्यासाठी सुद्धा एकांत शोधावा लागेल...
जेव्हा कधी आपल्याला वाटेल की एखादी आपल्या जवळची व्यक्ती दु:खी आहे त्यावेळी तिला एकटे राहू द्या... तो अनुभव त्या व्यक्तीला खूप काही देऊन जातो सांत्वन करण्यापेक्षा त्या व्यक्तीला थोडासा वेळ देणे जास्त योग्य... एकांत आणि एकाकिपणा यात खूप फरक आहे... वपूंच्या भाषेत सांगायचे तर 'एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा, एकांताची माझी व्याख्या फार वेगळी आहे. परिसराचं मौन म्हणजे एकांत. आणि परिवारात असतानाही निराधार वाटणं हे एकाकीपण. जेव्हा कधी दु:ख होईल तेव्हा एकांतात जा, मनसोक्त रड. जमिनीला अश्रू हवे असतात. मातीचं देणं चुकवलं की हलका होशील. वर चढशील, आकाशाजवळ पोहोचशील.असचं कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम, 'तुका आकाशाएवढा' असं लिहून गेला असेल.’
आयुष्य जगताना खूप खाचखळगे होते, असणार आणि कायम राहणार...चालताचालता लागलं तर कोणी चालणे सोडत नाही.... आयुष्यात जवळचे कोणी गेले तर कोणी जगणे सोडत नाही.. तसेच कोणी बरोबर असो वा नसो एकांत हा सुद्धा कोणीच सोडू शकत नाही...
एकदा असच एकट बसून विचार करत होतो ...आपण काय कमावले आणि काय गमावले याचा... मग आठवेल की किती दिवस आपण गाभूळलेल्या चिंचा खाल्या नाहीत.. आकाशात उडणार्या पक्षाकडे एकटक पाहिले नाही... जत्रेत मिळणारी शिट्टी वाजवली नाही... रात्री अंगणात झोपून काळ्याकुटट आकाश्यातल्या चांदण्या मोजल्या नाहीत... कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्म आता उरला नाही... ती उडू शकते कारण तिचे पंख तिने कधीच बांधले नाही.. आपण मात्र अजूनही आपले पंख बांधून उडण्याचा प्रयत्न करतोय...मनसोक्त हसण्यासाठी सुद्धा आपल्याला लोक काय बोलतील याचा विचार करतो.. लहानपण देगा देवा हे वाक्य अजूनही हवेहवेसे वाटते ते या कारणांमुळेच...
'एकांत' इतर अनुभवांसारखाच हा सुद्धा एक प्रकृतीचा आणि मनाचा भाग आहे आणि तो फक्त अनुभवायचा कधी दु:खात तर कधी सुखातही...
Tuesday, May 18, 2010
अपेक्षांचे ओझे
वृत्तपत्र - ई-सकाळ
पालक आणि मुले यांच्यातली दरी आणखी खोल खोल होत चालली आहे का??.. असा प्रश्न निर्माण करणारा हा लेख....
एखादे अपत्य जन्माला आले की त्याबरोबर अजून एका गोष्टीचा जन्म होतो आणि तो म्हणजे ' अपेक्षा ' या लहान वाटणार्या शब्दाचा...
लहान असताना मुलाच्या तोंडी पहिला शब्द असतो तो 'अ'.. पण मुलाने 'अ'पेक्षा जास्त बोलावे साठी प्रयत्न सुरू होतात... मग त्याला काका, मामा, दादा, मावशी असे शब्द बोलायला शिकवले जाते... आणि ते तो बोलू लागला की अजून बरेच शब्द (जे त्याला त्या वयात शक्य होऊ शकत नाही ते सुद्धा) त्याला शिकवण्याचा अट्टहास केला जातो....मूल जसजसे मोठे होत जाते तसेच अपेक्षेचे शेपूट वाढत वाढत जाते...
आपला मुलगा आपल्या शब्दाबाहेर नाही हे दाखवण्यासाठी नकळत आपण त्याच्यावर मोठे ओझे टाकून मोकळे होतो (मी नकळत असे म्हटले आहे) काही मुलांनी जरी हे कर्तव्य म्हणून स्वीकारले असले तरी तुरुंगवास भोगत असल्याचा भास बाकीच्या असंख्य मुलांना होत असतो...
मान्य आहे की जन्मदात्यांचा अधिकार मुलांवर त्यांच्यापेक्षा अधिक असतो आणि हे आजची तरुण पिढी जाणून आहे आणि तरीसुद्धा त्यांच्यावर निर्बंध लादण्याची गरज आहे का???.... हा प्रश्न पालकांनी स्वतःला विचारण्याची वेळ आता आली आहे.
बर्याचवेळा नातेवाईकांकडून 'तुमच्या आईवडिलांनी स्वतंत्रपणे किती कष्ट करून हे सार तुमच्यासाठी उभे केले आहे' हे विधान सारखे सारखे ऐकवले जाते पण समजा तेच स्वातंत्र्य मुलाला एकदा दिले तर???
जेव्हा जेव्हा मुले चुकतात तेव्हा त्याची जाणीव त्यांना करून देणे ह्यात काहीच वावगं नाही पण त्यांच्या प्रयत्नांना खतपाणी घालण्याचे काम मोठ्यांनीच केले पाहिजे आणि त्याचा फायदा पालक आणि मूल या दोघांना होऊ शकतो...
सध्यातरी माझ्या मते मुंबईमध्ये ७० ते ७५ टक्के आईवडिलांच्या काही अपेक्षा तंतोतंत जुळत असतील
त्यातली एक म्हणजे आपली मुले इतरांपेक्षा ग्रेट असावीत...
आणि दुसरी म्हणजे आपण विवाहासाठी ठरवलेले स्थळ हेच त्यांच्यासाठी योग्य आहे आणि तोच त्यांनी मानावा...
पहिली अपेक्षा पूर्ण करण्याचा सर्वच मुले प्रयत्न करतात कारण तिकडे प्रश्न असतो तो फक्त मेंदूला चालना देण्याचा (आणि कधीकधी स्वार्थीपणाचाही)
पण दुसरी अपेक्षा पूर्ण करताना कोणी क्लिन बोल्ड होतो तर कोणी रन आऊट कारण इकडे ना मेंदू चालतो ना शहाणपणा.. असतो तो फक्त आणि फक्त वेडेपणा... यावेळी शरीराला, मेंदूला आणि बहुदा आत्म्याला सुद्धा मनानेच काबीज केलेले असते आणि या वेडेपणामध्येच आपण कबुलीजबाब आईवडिलांना देतो...त्यांच्यासाठी मात्र तो अपेक्षभंगाचा झटकाच असतो...
त्यांना तो सहन होत नाही मग लगेचच मुलांना न विचारता बाकीची जुळवाजुळव सुरू होते.. मुलांच्या विरोधात जाऊन त्यांची मते न जाणता लग्न ठरवले जाते... यावेळी मुलाच्या मनात काय चालले आहे... त्याचा होकार नकार याला काहीच महत्व दिले जात नाही..अशावेळी मुलांसाठी हा अपेक्षभंगाचा झटका असु शकत नाही का??
आपल्या मुलाने/ मुलीने पाहिलेले स्थळ सारा विचार करून पाहिले असेल असे मोठ्यांना अजिबात वाटत नाही का??.. की त्यांना असे वाटूनच घ्यायचे नाही?
मुलांवर विश्वास टाकून जर त्यांची मने जिंकता आली तर त्यांच्या मनातला मोठ्यांविषयी असणारा आदर अजून खूप पटीने वाढेल यात तीळमात्र शंका नाही...जनरेशन गॅप मधला फरक जाणून घेऊन एकमेकांना समजून आणि जाणून घेण्याची वृत्ती प्रत्येकाने (मोठ्यांनी आणि तरुणपिढीने सुद्धा) मनात बिंबवण्याची गरज आहे आणि ती यापुढेही राहीलच...
अपेक्षाभंग, आत्महत्या, भांडणतंटा, घटस्फोट, मानसिक त्रास, दु:ख, क्लेश या आणि अशा गोष्टींचे ओझे कमी करायचे असेल तर एक आणि एकाच उपाय आहे तो म्हणजे समोर असणार्या व्यक्तीच्या डोक्यावरचे 'अपेक्षांचे ओझे' रिक्त करणे...
Thursday, May 13, 2010
चला चला गावाकडे पळा... भाग-४

दोनचार घरे सोडून आता आपला वाडा दिसू लागतो... वाडा दिसताच आपण आईचा हात सोडून धावत धावत त्या दिशिने पळतो...दारातच तुळशीला पाणी घालणार्या आपल्या आजीला त्याच वेगाने घट्ट बिलगतो... 'आलास कारं माझ्या लेकरा' अश्या आर्त आवाजात आजी आपल्याला मिठीत घेते...मन भरेपर्यन्त मुके घेते...सार्याना एकत्र पाहून नकळत तिचे डोळे भरतात.. आजोबा देवघरात देवाची पूजा करत असतात....आपल्याला पाहून ते मंत्र बोलत बोलत स्मित हास्य करतात... पूर्ण वाड्याकडे नजर फिरवून आपण मागच्या बाजूच्या अंगणात जातो.... तिकडे असलेले जांभूळ आणि पेरूच्या झाडाला किती फळ लागली आहेत हे आपण पाहून घेतो... मागच्या अंगणातच हातपाय धुवून आपण पुन्हा देवघरात आजोबांकडे जातो... देवाला लावलेले गंध ते आपल्याला सुद्धा लावतात.... आणि पाठीवरुन हात फिरवतात....
थंडी वाजत असल्याने सारे आंघोळीच्या बंबाजवळ जाउन हात शेकत बसतात.... पाणी गरम झाल्यावर आई एकेकाला पाणी काढून देते..... एका बादलीत आपण आणि काकाचा एक मुलगा असे एकत्र आंघोळीला बसतो..... एकमेकांना भिजवत मजा घेत घेत आंघोळीचा कार्यक्रम शेवटी आटपतो.... आई आपल्याला कपडे घालून केसाचा भांग पाडून तयार करते.... नाष्ट्या मध्ये मुंबईवरुन आणलेले काही खाण्यापेक्षा आजीच्या हातची शेवयांची खीर, शिरा यावर सारी सेना तुटून पडते....
Tuesday, May 11, 2010
चला चला गावाकडे पळा... भाग-३
बाजूलाच दूरवर पसरलेल्या शेताकडे नजर जाते आणि सोनेरी पिवळी कणसे आपल्या येण्याने आनंदित होऊन डोलतात की काय असा भास होतो.... आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैर्या पाहून तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही....
त्या तोडण्याचा मोह ' आपण नंतर येऊन तोडूया ' असा विचार करून त्या क्षणी का होईना आवरतो...
गावाच्या जवळच असणारी विहीर आता दिसू लागते... तिकडे पाणी भरणारे गावकरी आपल्याकडे पाहत असतात... त्यांच्याकडून आईवडिलांची विचारपूस सुरू होते... आई वडील त्यांच्याबरोबर बोलताना आपण लगबगीने विहिरीत डोकवतो.... हिरव्या पाण्यात आपलेच प्रतिबिंब न्याहाळताना हरवून जातो....विहिरित डोकावताना ' ओओओ ' असा जोरजोरात आवाज करतो...तेव्हा काही सेकंदाताच आपलाच आवाज पुन्हा आपल्याला येतो... काहीतरी जादुच होते आहे की काय?..असे मनात येते.... एकदाच ओरडलो तरी आवाज ३ वेळा कसा येतो हे जाणण्यासाठी पुन्हा आवाज करतो.... कान विहिरिला लावून पुन्हा पुन्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.... आईचे बोलून झाले की तिचा हात धरून पुढे निघतो....
गावातील ओळखीचे चेहेरे आता दिसू लागतात...गावात येताच समोरच मंदिर दिसते.. मंदिरासमोर मोठे वडाचे झाड ... त्याच्या पारंब्याना बिलगुन खेळणारे चिमूरडी मुले आणि सावलीत कट्यावर वृतपत्र वाचत बसलेली आजोबांच्या वयाची मंडळी...' राम राम पाव्हनं..कसं काय चाललाय??...' आई बाबांना पाहून प्रत्येकजन आमची खुशालि जाणून घेतो.... त्यातलेच कोणी आजोबा मग आपले गालगुच्चे घेतात आपण पण ओळख असल्यासारखे आईच्या पदरामागे लपून लाजत लाजत त्याना स्मित हास्य देतो... पण पुढे गेल्यावर ते कोण होते??? मी त्यांचा कोण लागतो??? ते कुठे राहतात?? असा प्रश्नांचा वर्षाव आपण बाबावर करतो .... बाबा आपल्याला ते कोण आहे हे फोडणी करून समजवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण सार काही समजल्यासारखे मान डूलवतो... पण आपल्याला काहीच समजले नाही हे आपल्याला आणि बहुदा बाबांनासुद्धा माहीत असते...
क्रमश:
Friday, May 7, 2010
चला चला गावाकडे पळा... भाग-२
गाडी स्थानकावर येऊन थांबते... बाबा आवाज देतात बेटा चला उतरायचे आहे... पुन्हा खेळण्यांची बॅग हातात घेऊन आपण खाली उतरतो... बस स्थानकावरच्या हॉटेल मध्ये बाबा घेऊन जातात... कोण कोण काय काय खाणार??? असे विचारताच एक एकाची फर्माईश सुरू होते.... कोणाला गरमागरम भजी हवी असते...कोणाला बटाटा वडे, समोसे...तर कोणी मिसळ वर ताव मारतो...सर्व खाऊन झाल्यावर गरमागरम कटिंग चहा पिऊन सारे तृप्त होतात...
त्यापुढचा प्रवास जीपने होणार असतो... जवळजवळ १२/१३ माणसे असूनसुद्धा त्याचा ड्राइवर जायला तयार नसतो.... साहेब अजुन ४ सीट होऊदेत मग हलवतो गाडी... गाडी म्हणजे जणू कोंबड्यांचा खुराडा होऊन जातो... अजुन ४ सीट बोलून ६ जण गाडीवर स्वार होतात... ड्राइवर गाडीच्या अर्धा बाहेर जाउन गाडी कसा चालवतो हे त्याचे त्यालाच माहीत... कच्या रस्त्यावरून जाताना गाडीपेक्षा माणसाचेच पार्ट जास्त हलतात....या सार्या गर्दीमध्ये आपले लक्ष मात्र बाहेरच असते... गावाकडची वाट आपल्याला साद घालत असते.... आंब्याची, चिंचाची झाडे दिसायला हळूहळू सुरूवात झालेली असते... या पुढच्या २० मिनिटांच्या प्रवासात आपण विचारण्याच्या आतच आई आपल्याला 'आता आलेच हा आपले गाव' असे कमीत कमी १०/२० वेळा बोलून मोकळी होते...
गाडी गावच्या फाटकापाशी येऊन थांबते... बाहेर येताच आपण २ मिनिटांच्या अंतरावर वसलेल्या आपल्या छोट्याश्या गावाकडे हसरी नजर फिरवतो.... गावातले मंदिर आणि त्यावर फडकणारा भगवा झेंडा, जुनी कौलारु घरे, आणि लालसर मातीत न्हाहून निघालेली पायवाट, हिरवी पिवळी झाडे....सारे सारे आपल्या स्वागतासाठी सजले आहेत की काय असा भास होतो...
क्रमश:
Thursday, May 6, 2010
चला चला गावाकडे पळा...भाग-१
बाबांनी तिकीट बुक केले हे समजताच बॅग भरायला सुरूवात होते.. सापशीडी, बॅटबॉल, छोट्या छोट्या गाड्या, भातुकलीची खेळणी सार काही जमवायला लागतो आपण... कपड्यांची बॅग कोणाकडे ही असू देत पण खेळण्यांची बॅग मात्र आपल्याला आपल्याच हातात हवी असते... काका मामा ची मुले आपल्या बरोबर येणार यामुळे आपली स्वारी जास्तच खुशीत असते....
एसटी स्टॅंड ला जावुन उभे राहीले की, 'बाबा आली का गाडी' हा प्रश्न कमीत कमी ५० वेळा विचारून होतो...गाडी आली की धावत धावत जाउन खिडकी पकडायची....गाडी कधी चालू होते यासाठी ड्रायव्हर कधी येतो याकडेही बारीक लक्ष असते...
गाडी चालू झाली की आपल्या जिवात जीव येतो... रस्त्यावरची उलटी पळणारी घरे, दुकाने पाहून खूप गंमत वाटते....
रात्रीचा प्रवास म्हणजे त्यावेळी एक पर्वणीच असते....गाडीने मुंबई सोडली की आई लगेच आपल्या अंगावर स्वेटर चढवते.. बाहेर पाहणारे आपण आता नकळत हळूहळू डुलकी खावू लागतो.... आईच्या कुशीत झोप कधी येते समजत पण नाही...
बेटा उठा उठा ... बघ बघ घाट आलाय... आपण लगेच डोळे चोळत चोळत बाहेर पाहतो.... बाहेरचा परिसर पाहून आपण हे सारे आवाक होऊन पाहत असतो....सोन्याची दुनिया असल्याचा भास असतो तो...कोणता तरी उत्सव आहे का हा??? क्षणभर प्रश्न पडतो मनाला... चारही दिशा काळोखाने भरलेल्या, आकाश नीर्भ्र आणि मध्येच खोलवर पिवळी पिवळी तोरणे जी लांब लांब पसरलेली दिसतात... थोड्याच वेळात पुढे बोगदा येतो त्यातून जाताना आपण जमिनिखालून जातोय की काय असाच काहीसा अनुभव येतो... बोगदा संपला तरी मागे वळून वळून तो दिसत नाही तो पर्यंत त्याला न्याहाळत राहतो...
सारा सारा आनंद डोळ्यात सामावून स्मित हास्य घेऊन पुन्हा आपण आईच्या कुशीत निजतो... नेहेमी तहान भूक लागल्यावर रडणारे आपले पिल्लु सार सार विसरून शांत झोपलेले पाहून आई मिठीत घेऊन गोड गोड मुका घेते....
क्रमश:
Wednesday, May 5, 2010
सामान्य माणूस...
नही साब वहा पे ट्रॅफिक बहुत है.. मैं अभी खाना खाने जा रहा हूँ... ३०० रुपये होंगे मीटर से नही आउन्गा....
टॅक्सी टॅक्सी.. अबे साले सुनते भी नही, ये हमारे लिये है या हम इनके लिये... दिमाग की दही करते है....
या सर्वाना पोकळ बांबुचे फटके द्यायला पाहिजेत... बाकी वेळी ठीक आहे पण अशा वेळी तरी यांनी ऐकले पाहिजे ना...
नाहीतर काय.... अहो आमच्या सोसायटी मध्ये चला बोलले की लगेच थोबाड वाकडी करतात ही लोक.....
टॅक्सीवाले, ऑटोरिक्षा वाले आणि सामान्यमाणूस यांच्यातली खडाजंगी...
कालच्या दिवसात एक एक संभाषण ऐकण्यासारखे होते... जितके हसायला येत होते त्यावेळी तितकेच डोक्यात विचार चक्र जोरजोरात फिरत होते... हा त्रास तसा नेहेमीचाच आहे... पण जेव्हा कधी आपत्कालीन स्थिती निर्माण होते तेव्हा त्याची जाणीव अधिक प्रमाणात होते... मग त्यावर सोल्यूशन नाहीच नाही हे लक्षात आल्यावर आपण एकटेच बडबडतो किंवा समोर जो कोणी असेल ( आपली आवडती व्यक्ती असेल तिलाही फुकट आणि तिच्या मनात नसताना सुद्धा ) तिला हे सर्व ऐकवतो... कधी कधी हा राग इतका अनावर होतो की एकाचा राग दुसर्यावर निघतो ( बिचारा त्याची चुकी नसताना सुद्धा )... आणि आपण मगाशी का रागावलो हा विचार करून पुन्हा आपण स्वत:वर चिडतो.....फाइनली पच्याताप करण्याची पाळी आपल्यावर येते...
एकूण काय आपण क्रांती आणण्याचा फक्त आणि फक्त विचार करू शकतो .... आणि समजा जर आणण्याचा प्रयत्न केला तर समोरचा आपल्याला वेड्यात काढतो... आपल्याला कोणी वेडा बोलला हे आपल्याला कसे चालणार बरे???.... म्हणून आपण सुद्धा असल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो... कधी कोणी चुकीचे वागतोय हे समजल्यावर मनातल्या मनात समोरच्यावर चिडतो..त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहतो... आणि काही करू शकणार नाही हे समजल्यावर काही झालेच नाही असे समजून सार काही विसरून जातो....
राजकीय पक्ष तर घडाळ्याच्या काट्यापेक्षा फास्ट....एका एका मिनिटांनी शब्द बदलतात (पक्ष बदलल्याप्रमाणे)....माझ्यामते आपण बहुदा त्यांच्यापेक्षा फास्ट आहोत ते जितक्या लवकर निर्णय बदलतात ना आपण तितक्या लवकर मनातल्या मनात पलटी मारतो आणि पुन्हा समोर जो कोणी असेल त्याला (ज्याला या कशातच इण्टरेस्ट नसतो त्याला) हे होणारच होते मला माहीत होते असे बोलून स्वत: ला सर्वांसमोर मिरवतो.. आणि त्यातच आनंद मानतो... तसे पण सध्या या कन्न्डीशन ला बिचारा सामान्य माणूस इतकेच करू शकतो....
Tuesday, May 4, 2010
चक्का जाम
लाखो लोक रस्त्यावर
ना लोकल... ना रिक्षा... ना बस...
मोटरमन संपामुळे प्रवाशांचे हाल
दिलासा 'एनएमएमटी'च्या १०० बसचा!
मध्य-पश्चिम-हार्बर रेल्वेसेवा ठप्प!
संपामुळे मुंबईच्या 'लोकल'ची रखडपट्टी
मुंबईच्या लोकलला लागणार 'उपासा'चा ब्रेक!
अत्यावश्यक असेल तरच प्रवास करा!
प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त १०० बस
बेस्ट, रेल्वे, मोनो, मेट्रोसाठी एकच तिकीट
एका दिवसात इतक्या हेडलाइन्स (सॉरी ब्रेकिंग न्यूज़) बापरे!!!!!!!!!
आंदोलनात कोण कोण बेशुद्ध पडले माहीत नाही पण हे वाचून माझे डोके तर नक्कीच गरगरु लागले आहे. पहिली गोष्ट म्हणजे आंदोलन नक्की का चालू आहे हेच नीट माहीत नसल्याने मी तरी या रेल्वे कर्मचार्यांना नको नको ते बोलून झालो होतो.
(इन शॉर्ट शिव्या देऊन झालो होतो) आज सकाळीच वाचले मी की, ' मोटरमन संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सहाव्या वेतन आयोगाने मोटरमनचा ग्रेड पे वाढवावा, अशी शिफारस केलेली आहे. ग्रेड पे ४२०० रुपयांवरून ४८०० रुपये करण्याची मागणी आहे. ग्रेड पे वाढवल्याने रेल्वेवर फार मोठा बोजा पडणार नाही. किलोमीटर अलाऊन्स वाढवण्याचीही मागणी आहे. त्याशिवाय मोटरमनसोबत सहायक मोटरमन देण्याची मागणी आहे.'
ह्म्म्म्म... तर असे आहे सर्व.... यांच्या मागण्या सरकार ने ऐकल्या का कधी??... त्यावर काही तोडगा काढला का कधी ???.... पण या मागण्या पूर्ण केल्या नंतर पुन्हा ह्यानी अजुन नवीन मागण्या घातल्या तर??...
एका प्रश्नाचे उत्तर मिळाले की नवीन प्रश्न..... माणसाची सर्वात जवळची सवय किंवा खोड म्हणा... आणि मीही त्यातलाच एक...
रस्त्यावर ट्रॅफिक जॅम, मोबाइलचे नेटवर्क जॅम, गरमिने माणूस जॅम या सार्या त्रासाने माणसाचे डोके जॅम
मी काय लिहितोय याचा मेळ बसत नाही कारण सध्या परिस्थिती तशीच आहे...डोक्यात विचारांचे अणू रेणू तयार झाले आहेत
आणि चक्रिवादळासारखे घोन्गावत आहेत इकडून तिकडे....
कालपर्यंत रेल्वेच्या पाठीशी उभी असणारी काही राजकीय मंडळी आज बाहेर पडली आहेत आणि लोकांना वेठीस धरू नका असे सांगत आहेत... बिचारे रेल्वे वाले ना घर के ना घाट के अशी परिस्थिती झाली असेल त्यांची... काही नेत्यांचे वेगळे चालू आहे की आंदोलन बंद करा नाहीतर आम्ही आमचे आंदोलन करू... आधीच लोकांच्या डोक्यात तांडव चालू आहे त्यात तुमची मारामारी कशाला रे.... काय रे देवा...
आज दुसरा दिवस तरीही संप चालूच आहे कधी संपणार वाट पाहतोय...कसाबला काय शिक्षा होणार याची सुद्धा वाट पाहतोय... डोक्यामध्ये याशिवाय कामाचे वादळ गोल गोल गुमवते आहे याचा मात्र फक्त आणि फक्त त्रास होतोय...
Monday, February 1, 2010
भक्ति
पण कधी कधी मनात एक विचार येऊन जातो खरच हे काय आहे तरी काय... माणूस खरचं देवाला भेटायला आतुर असतो की आपले मागणे मागण्यासाठी आसुसलेला असतो... कोणाच्या मनात काय चालेल हे मला तरी इकडे बसून समजणार नाही... असे मानून ते पण मी गणरायावरच सोडतो... माणूस पण कसा असतो ना जिकडे त्याला मर्यादा येतात तिकडे तो सर्व देवावर सोडतो... आणि जे त्याला जमते ते केल्यावर मी ते केले हे मिरवत फिरतो...
सकाळी टिव्ही वर सिद्धीविनायकचे दर्शन झाले... त्याला पाहण्यासाठी जमलेली लोकांची गर्दी पाहून आनंद होतो पण काही विचार मनात डोकावीतात आणि मन कासावीस होते... की आज भारतात लोक इतके शिकून सुद्धा अशिक्षित तर नाही ना राहीले???... हा प्रश्न पडण्याचे एक आणि एकच कारण आहे ते म्हणजे घरातली गणरायची मूर्ती असो किंवा सिद्धीविनायकाची शेवटी देव तर एकच आहे ना... मग हा साधा विचार माणूस का करत नाही???... की त्याला करायचाच नाही... जर भक्ति खरी असेल तर देव नक्कीच भेटतो मग तो कसाही भेटेल त्यासाठी सिद्धीविनायकचे दर्शन झाले पाहिजे असा अट्टहास का???
मला माहीत आहे की मी असे लिहिण्याइतका मोठा नक्कीच नाही झालो पण जे दिसते मनात जे काही कुजबुजते आहे ते मांडण्यासाठी काय हरकत आहे... आजच्या धावत्या जगात आपण असा विचार करायला लागलो तर खरच येणार्या पिढीला आपण काय शिकवणार??..
आपण देवाला माणसात पाहायला शिकलो तर????......देव सर्व पाहतोच आहे आणि त्यालाच ठरवू देत काय बरोबर आणि काय चुकीचे... मला जे काही वाटते ते त्यालाच अर्पण करायचे हे काम मी करतोय एकदम प्रामाणिकपणे.... आणि या पुढे मी काय करायचे ते ठरवण्यासाठी देव समर्थ आहेच... आता त्याला पण थोडा वेळ देतो नाहीतर देव बोलले सर्व तूच बोलतोयस अरे मला पण थोडा वेळ दे ना...:)... तर आता इकडेच थांबतो...